मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिल्या जाणाऱ्या ‘जाणता राजा’ या उपमेवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.भाजप नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आव्हाडांनी, ‘महाराष्ट्रासमोर ठाकलेली कोणतीही अडचण दूर करण्याची ताकद शरद पवारांकडे असल्याने त्यांना दिली गेलेली ‘जाणता राजा’ ही उपमा योग्यचं आहे.’ असं वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे ‘आजचे शिवाजी: नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याने महाराष्ट्रात एका नव्या वादाला तोंड फुटलं असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने या पुस्तकावरून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपने देखील या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना दिल्या जाणाऱ्या ‘जाणता राजा’ या उपमेवरुन चांगलंच कात्रीत पकडलं. अशातच आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांनी देखील कोणालाही ‘जाणता राजा’ उपमा देणं अयोग्य असल्याचं म्हणतं शरद पवारांवर निशाणा साधला.
दरम्यान, ‘जाणता राजा’ उपमेवरुन भाजप व उदयनराजेंकडून शरद पवारांना लक्ष्य करण्यात आल्यानं जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी सडेतोड उत्तर दिलं असून त्यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे, ” ‘काही’ लोक म्हणतात आम्ही शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. काही लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पवारांवर टीका करतात. होय शरद पवार हे जाणते राजे आहेत.”