रवींद्र कदम
नैसर्गिक आपत्तींवर मात करून पिकवलेल्या कांद्यावर काही लखोपती, तर काहींचा खर्च ही निघेना
नगर – यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लाल कांद्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले. त्यात अनेक शेतकरी लखोपती तर काहींचा खर्च ही निघेनासा झाला आहे. त्यात दररोज कांद्याच्या भावात चढ-उतार होत असल्याने शेतकरी अस्वस्थ होत असल्याचे चित्र सध्या बाजार समित्यामध्ये दिसत आहे.
राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्रच थैमान घातल्याने शेतमालाचे सर्वत्रच नुकसान झाले. त्यामुळे कांद्यासह सर्वच पिके भूईसपाट झाली. त्यातच दररोज ढगाळ वातावरणाचा परिणाम कांदा पिकांवर झाला.
त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्यावर तीन-चार दिवात औषधफवारणी करावी लागल्याने शेतकऱ्यांना त्याचा खर्चही पेलवानासा झाला. ते करूनही कांदा पोसला नाही. त्यामुळे कांद्याचे उत्पन्नातही घट झाली. परिणामी कांद्यासह इतर शेतमालाची मागणी वाढल्याने त्याचे भाव गगनाला भिडले.
जिल्ह्यात अनेक शेतकरी हे लाल कांद्याचे उत्पन्न घेतात. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जिरायती शेतात कांद्याची पेरणी करतात तर बागायती शेतात कांद्याची लागवड केली जाते. त्यासाठी जून-जूलै महिन्यात कांद्याचे रोप टाकले जाते. त्यानंतर एक-दीड महिन्यात रोप लागवडी योग्य होते. त्यांतर कांद्याची लागवड केली जाते.
जिल्ह्यात कांदा पेरणी क्षेत्र कमी असून, लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. त्याचे उत्पन्न शेतकऱ्यांना जास्त मिळते. त्यावर शेतकऱ्यांना एकरी 45 ते 50 हजारांवर खर्च झाला. मात्र, यंदा परतीच्या पावसाचे थैमान त्यात ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात शेतपीकांचेनुकसान झाले. त्यामुळे कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याचे भाव गगणाला भिडले. यापूर्वी कधी 40 रुपयांवर न मिळालेल्या भाव यांदा 200 वर गेला.
त्यामुळे कधी नव्हे कांद्याला भाव शेतकऱ्यांना मिळाला. त्यात अनेक शेतकरी लखोपती झाले तर अनेक शेतकऱ्यांचे खर्चही निघले नसल्याचे बोलले जात आहे. ऑक्टोबर मध्ये लागवड झालेल्या कांद्याचे उत्पन्न बऱ्यापैकी निघत आहे. मात्र त्या कांद्यावर खर्च तसाच झाला असून त्यात कांद्याच्या भावात दररोज चढ-उतार होत आल्याने त्यांच्यात अस्वस्था वाढली असल्याचे बाजार समित्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळायला हवा.
व्यापाऱ्यामुळे टळले शेतकऱ्याचे नुकसान
वांबोरी उपबाजार समितीत एका शेतकऱ्याकडून चांगल्या कांद्याच्या गोण्यांमध्ये खराब कांद्याची एक गोणी गेली होती. यामुळे शेतकऱ्याला कमी भाव जाहिर झाला होता. मात्र व्यापारी निलेश पारख यांनी या गोण्यांची पाहणी केली असता त्यात चांगले कांदे आढळल्याने त्यांनी या शेतकऱ्यास पुन्हा चांगला भाव मिळून दिला. त्यामुळे व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे या शेतकऱ्याचे नुकसान टळले.
यंदाचा पाऊस, निवडणूक, कांदा भाववाढ पुन्हा नाही
दुष्काळाच्या सावटाखाली असलेला नगर जिल्ह्या यंदा पावसाने झोडून काढला. त्यामुळे यंदा सर्वत्रच भूजल पातळी वाढली असून काही भागात बारामाही पाण्याची अडचन असणाऱ्या भागाचा पाणी प्रश्न मिटला आहे. त्यामुळे वडीलधाऱ्यांसह आजच्या तरुणांनी कधी नव्हे पाहिलेला पाऊस यंदा पाहिला.
तसेच राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल घडवीणारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल उमेदवारांसह जनतेला धक्का देणार ठरला. तर 2000-2001 मध्ये कांद्याने 100 खाल्ला होता. मात्र, यंदा कांद्याने 200 ते 250 प्रति किलो रुपयांपर्यंत मजल मारली. त्यामुळे यंदाचा पाऊस, विधानसभा निवडणुकीचा निकाल, अन कांदा भाववाढ पुन्हा होणे नाही अशी चर्चा बाजार समितीत झडत होती.