नगर – विधानसभा निवडणुकीत भाजपची झालेली वाताहत पाहता पुन्हा एकदा पक्ष संघटना जिल्हा मजबूत करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याची सुरवात उद्या होणार जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीपासून करण्यात येणार आहे.
दक्षिण, उत्तर व नगर शहर असे स्वतंत्र तीन जिल्हाध्यक्ष आता राहणार आहे. जिल्ह्यात सध्या तरी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांना पक्षांतर्गत शह देणाऱ्यासह त्यांना विरोध करणाऱ्याची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे सहाजिक विद्यमान जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचे नाव मागे पडून संघटना वाढीबरोबर विखेंच्या विरोधात सक्षमपणे उभा राहिली त्या दृष्टीने माजी आमदारांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नगर शहर जिल्हाध्यक्ष, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष व नगर उत्तर जिल्हाध्यक्ष अशा तीनही पदांच्या निवडी शुक्रवारी (उद्या) दुपारी साडेबारा वाजता सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत या निवडी होईल. जिल्ह्यातील 17 मंडलांपैकी 9 मंडलांच्या अध्यक्षांची नावे जाहीर झाली आहेत. दोन मंडलाध्यक्ष निवडी निवडणुकीतून झाल्या आहेत तर राहिलेल्या 7 मंडलाध्यक्ष नियुक्त्या विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या आदेशानुसार बुधवारी जाहीर करण्यात आल्या.
भाजपच्या संघटनात्मक रचनेत आतापर्यंत एक ग्रामीण जिल्हाध्यक्ष व दुसरा नगर शहर जिल्हाध्यक्ष अशी दोनच मुख्य पदे होती. पण आता भाजपने ग्रामीण जिल्हाध्यक्षांमध्ये आणखी एक पद वाढवले आहे. आता नगर दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष व नगर उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशी दोन अध्यक्षपदे निवडली जाणार आहेत.
तसेच नगर शहर जिल्हाध्यक्ष अशा स्वतंत्रपदातून तिसरा जिल्हाध्यक्ष असणार आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोठी संख्या असली तरी एकमताने ही निवड करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील नेत्यांनी आहे. त्या दृष्टीने मंगळवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष निवडीवर चर्चा झाली.
यापुढे जिल्ह्यात होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या दृष्टीने महत्वाच्या राहणार आहे. महाविकास आघाडीमुळे सध्या जिल्ह्यात काय पण राज्यात भाजप एकटा पडला असून महाविकास आघाडीतील एकत्रित असलेल्या तीन पक्षांशी झुंज भाजपला द्यावी लागणार आहे. त्यामुळे यासाठी सक्षम व प्रभावी जिल्हाध्यक्ष असले आवश्यक आहे. त्या दृष्टीने कोअर कमिटीमध्ये जिल्हाध्यक्षपदांच्या नावाबाबत चर्चा झाली.
त्यामुळे इतर इच्छुकांचा विचार न करता समक्षपणे पक्ष संघटना वाढीबरोबरच या निवडणुकांमध्ये पक्षाला यश देवू शकणारा तसेच पक्षांतर्गत विखेंना देखील शह देणाऱ्यांच्या नावाला शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी आमदारांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.