गुवाहाटी : आसाममध्ये आज्ञात व्यक्तींकडून सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (का) आंदोलन करणाऱ्यांवर गोलाघाट जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला. तर, उदलगिरी जिल्ह्यात ऑल आसाम स्टुडंटस् युनियनचा केंद्रीय नेता आणि त्यांच्या मित्रावर हल्ल्याच प्रयत्न झाला.
आसामच्या उत्तर भागातील गोलाघाट जिल्ह्यात रूपा आणि पंकज राजखोआ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. तर विनय बरूआ यांची मोटारीचे नुकसान केले. ही घटना गोलाघाट शहराच्या बाहेरील हबीअल गावात घडली. बरूआ आणि राजखोआ यांनी का कायद्याविरोधातील निदर्शनाचे नेतृत्व केले होते.
रूपा या ढेकीयाल गावच्या सरपंच आहेत त्या म्हणाल्या, मी माझ्याकडे आलेल्या पाहुण्यांचे मी स्वागत करत होते त्यावेळी मी गोळीबाराचा आवाज ऐकला. आमच्या आवारात काही गोळ्या पडलेल्या दिसल्या. त्यानंतर आम्हाला आमच्या जीविताची भीती वाटू लागली आहे. आम्हाला असुरक्षित वाटत आहे.
बरूआ म्हणाले, आमच्या निदर्शनानंतर मी राजखोआ यांच्या गरी गेलो. त्यावेळी आम्ही काही मुद्द्यावर चर्चा करत होतो. मी माझी मोटार बाहेर उभी केली होती. तिचे मोठे नुकसान केले. मोटारीवर गोळीबार करण्यात आला. हा एक व्यापक कटाचा भाग आहे. आमचा निदर्शनाचा आवाज दाबण्याचा संदेश देण्याचा त्यामागे हेतू आहे.
आसूचे सहायक सरचिटणीस मुनवर हुसेन म्हणाले, का विरोधी कार्यकर्त्यांना लक्ष्य बनवण्याची ही काही पहिली वेळ नाही. आसुचे सदस्य नितू सैकिया यांच्या घरावरही 12 डिसेंबर रोजी गोळीबार करण्यात आला होता. हा गुन्हा कमरगाव पोलिस ठाण्यात नोंद आहे. पण पोलिसांना अद्याप हल्लेखोर शोधता आले नाहीत.
हुसेन म्हणाले, भाजपाचे खुमताईचे आमदार मृणाल सैकिया हे या मागचे सुत्रधार असल्याचा नागरीकांचा आरोप आहे. मात्र, पोलिस त्यांची चौकशी करण्याची हिंमत दाखवू शकले नाहीत. आम्ही पोलिस महासंचालक, पोलिस अधिक्षक, आणि गोलाघाटचे उपायुक्त यांना सैकिया यांना अटक करुन खुमताई तेथे राहणाऱ्या नागरीकांच्या जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची मागणी केली आहे.
याबाबतचा तपास अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या हेतू बाबत आताच काही भाष्य करणे घाईचे होईल. आम्ही काही जणांना ताब्यात घेतले असून काडतुसे तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत आम्ही या प्रकरणाचा छडा लावू, असा आम्हाला विश्वास आहे.
उदलगिरीमध्येही आसूचा माजी नेता इंतजुल अली हे प्रवास करत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. ते पणेरी येथून आपल्या नातेवाईकांना भेटून बोलेरो जीपमधून परतत असताना त्यांचे वाहन अडवून हल्ला करण्यात आला. एका कठीण वस्तूने त्याच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. ही कठीण वस्तू बंदूक होती का अन्य काही हे आम्ही पाहू शकलो नाही. आम्ही जीव वाचवून सेकंदात तेथून निघून आलो. मात्र पोलिसांन ही घटना गाडी चालवताना झालेल्या वादातून घडली असल्याचे सांगितले.