सुपा – पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात युरिया खताची मागणी वाढल्याने तीव्र टंचाई जाणवत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पारनेरसह सुपा परिसरात युरिया खताची टंचाई जाणवत आहे.
साधारणपणे दीपावलीनंतर लागवड केलेला कांदा व गहू डिसेंबर महिन्यात खुरपणीला येतात. खुरपणीनंतर पाणी देण्याअगोदर युरिया खताचा डोस देणे आवश्यक असते. त्यामुळे पिकाला काळोखी पकडून माल थंडाव्याच्या साह्याने जोर धरतो. आता कांदा, गहू या पिकांच्या खुरापण्या झाल्या असून, पिके पाण्यावर आली आहेत. परंतु पुरवठ्याच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने उज्ज्वला, जय किसानचा युरिया मिळतच नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. अगोदरच पिके खुरपली असल्याने पोटातील ओलावा कमी झालेला असतो. त्यात युरियाची वाट पाहात पाणी देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे पिके सुकत आहेत.
ऐन पाणकळ्यात पाण्याचा सुकाळ असताना केवळ खतांमुळे पिके सुकत असल्याचे शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे. कृषी सेवा केंद्रांशी सपर्क साधला असता, चालू वर्षी पाऊस पाणी चांगले असल्याने खताची मागणी वाढली आहे. परंतु येणाऱ्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने युरियाची टंचाई निर्माण झाली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना शेजारील शिरूर, नगर तालुक्यांना जाऊन जास्त पैसे मोजून युरिया खरेदी करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांचा वेळ व पैसा जात आहे. शासनाने पारनेरसह सुपा परिसराला युरियाचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
मागणी वाढल्याने युरियाची टंचाई
सुपा परिसरात चालू वर्षी पाऊस पाणी चांगले असल्यामुळे ज्वारी, गहू, कांदा या मुख्य पिकांसाठी युरियाची मागणी मोठ्या प्रमाण वाढली आहे.त्याप्रमाणात युरिया मिळत नसल्याने टंचाई निर्माण झाली असल्याचे कृषी सेवा केंद्र चालक कैलास दहीवळ व नंदकुमार पवार यांनी सांगितले.