मुख्यमंत्र्यांनी दिले देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
नागपुर : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या एका भारूडाचा बुधवारी आपल्या भाषणात उल्लेख केला होता. काट्याच्या अणीवार वसली तीन गावें, दोन ओसाड एक वसेचिना असे या भारूडाचे शब्द होते. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आज ज्ञानेश्वर माऊली असते तर त्यांनी अच्छे दिन येईचिना, लोकांना नोकऱ्या मिळेचिना, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा होईचिना असे म्हटले असते, असे सांगत भाजपवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, 2014 मध्ये देशात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकार आल्यावर व्यावसायिक, गुंतवणूकदार यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला होता. गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात येत होते. पण नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यावर आलेले गुंतवणूकदार परत गेले. एकटा उद्योग मंत्री राज्यात उद्योग आणू शकत नाही. त्यासाठी राज्यात आणि केंद्रात तशी परिस्थिती असावी लागते. आमचे सरकार गोरगरिबांचे सरकार आहे. ते रिक्षावाल्यांचे सरकार आहे. बुलेट ट्रेनवाल्यांचे निश्चितपणे नाही, असे सांगून ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे काम आम्ही निश्चितपणे करू.
नागरिकत्व कायद्यावरून शिवसेनेच्या भूमिकेवर भाजप टीका करीत असताना त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, आधी देशातल्या हिंदूंना न्याय द्या. मग बाहेरच्या हिंदूंकडे बघा. बेळगावमधील महापौरांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बेळगाव, कारवारमधील मराठी माणसावर अत्याचार होतो आहे. मग ते हिंदू नाहीत का, तिथे भाजपचेच सरकार आहे. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असा नवीन शब्दप्रयोग आपण आज वापरत आहोत, असेही त्यांनी सांगितले.