पालकमंत्रिपदही राष्ट्रवादीकडेच असेल
पुणे -तीन आमदारांमागे एक मंत्री असे गणित धरले तर पुण्याला तीन मंत्रिपदे मिळतील. तसेच पालकमंत्रिपदही राष्ट्रवादीकडेच असेल. त्यामुळे मंत्री झाल्यावर सकाळी लवकर उठून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करावे. पक्षाला अर्थ आणि नियोजन, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन यासह अन्य महत्त्वाची खाती मिळाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील सभागृहात पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार दत्तात्रय भरणे, अशोक पवार, अतुल बेनके, सुनील शेळके, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पोपटराव गावडे, मंगलदास बांदल, यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, पूर्वीच्या सरकारने महानगरपालिका, सहकार, पणन, आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बदल केले. त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरपंच एका विचाराचा आणि समितीचे सदस्य दुसऱ्या विचाराचे’, चार प्रभागामध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ नाही, समन्वय नाही. अशा परिस्थितीत विकास कसा होणार. त्याध्ये बदल करू, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
ड्रॉ न काढताच आरक्षण
विधानसभेचे सोमवार (दि. 16) ते शनिवार (दि. 21) पर्यंत हिवाळी अधिवेशन आहे. त्यानंतर डिसेंबरच्या महिन्याअखेरीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे आमदार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच नुकत्याच पंचायत समिती आरक्षण सोडतीमध्ये हवेली तालुक्यातील आरक्षण सोडत कशापद्धतीने झाली त्याबाबत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ड्रॉ काढून हे आरक्षण काढले असते, तर काही चुकीचे नव्हते. मात्र, ड्रॉ न करता हे आरक्षण कसे काढले त्याबाबत मुख्यमंत्री आणि संबधित विभागाशी चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
त्यासाठी हरकती, सूचना पाठवा
चारच्या प्रभागात दोन नगरसेवक काम करतात, तर दुसरे दोघे त्यामध्ये खोळंबा घालतात. त्यामुळे ठराविक कामेच केली जातात. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच निवडणुका घेण्यासाठी काही हरकती, सूचना असतील तर पाठवा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.