अजित पवारांनी डागली तोफ : “अशांना’ पक्षात घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरू नये
पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून गेलल्यांना आम्ही नक्कीच रेड कार्पेट टाकणार नाही; परंतु नंतर तुम्हीच “आता तो सुधारलाय, त्याला त्याची चूक कळली’ असे म्हणून पक्षात घ्यायला लावू नका. कारण, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे अनेकजण आहेत. ती निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे असतात. त्यामुळे पक्षासाठी, आपल्या नेत्यासाठी मर मर राबतो, आमदार निवडून आणायला मदत करतो तोच बाजूला राहतो. त्याच्याअधीच दुसरा येऊन “मी कसा चांगला’ असे दाखवितो, असे स्पष्ट करून अजित पवार यांनी पक्ष सोडून गेलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंधर कामठे, प्रदीप कंद यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष अडचणीत असताना अनेकजण पक्षाला सोडून गेले, त्यांना “रेड कार्पेट’ टाकू नका जरा सबुरीने घ्या असे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष यांची ताकद असलेला, 15 वर्षे पालकत्व स्वीकरलेल्या जिल्ह्यात जिल्हा परिषद सोडली तर दोन्ही महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रसेला मोठा फटका बसला आहे.
ही खंत अनेक महिन्यांपासून मनात होती. एवढच नव्हे तर विरोधकांकडून “राष्ट्रवादी कॉंग्रेस औषधालाही उभे राहणार नाही’ अशी टीका केली. मात्र, निकाल लागला आणि पक्षाला चांगले दिवस आले. महाविकासआघाडीच्या माध्यमातून सरकार आले, पण आपण हुरळून जाता कामा नये, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करा, असे आमदार अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले.
“कामठेंची सटकली अन् ते गेले’ – जालिंदर कामठे यांना झेडपी आणि जिल्ह्याचे अध्यपद दिले तरी त्यांची काय सटकली आणि ते गेले. त्यामुळे पुरंदर आणि हवेलीची जागा येण्यासाठी मदत झाली. काही लोक आपल्याजवळ राहिली, मात्र ती पक्षाला मदत करीत नसतात तर ओझ असते. ते ओझे आज कमी झाले. काही बहाद्दरांना जावू नका असे म्हटले तर “आमची चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर झाली’ आता मागे येणार आहे. असे सांगितले, असे अजित पवार यांनी सांगताच सभागृहात एकच हश्या पिकला.
…त्यांना काय चूना देवू का? – “त्यांना विधानपरिषदेवर घ्या’ असे एक कार्यकर्ता मेळाव्यात म्हटल्यावर, “बाकीच्यांनी काय संतरंज्या उचलायच्या का?’ असा शब्दात सुनावत आमदार अजित पवार भडकले. उगाच काहिहि बोलून चिडायला लावू नका असे म्हणात, विधानसभेचे तिकिट देऊनही बदा-बदा पडतात, ज्यांना संधी दिली त्यांनी त्या संधीचे सोन करण्याऐवजी राख केली. सगळच त्यांना द्यायचे म्हटल्यावर तिकीट वाटपाच्यावेळी शांत राहण्यासाठी ज्यांना-ज्यांना शब्द दिला त्यांना काय चूना देवू, अशा शैलीता अजित पवार यांनी समाचार घेतला. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणावरून पक्षासाठी ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्यांना न्याय देणार, हे स्पष्ट होते. यावेळी बोलताना ज्यांनी जीवाचे रान केले, पक्षाला ताकद दिली त्या अमोल मिटकरीला विधानपरिषद देण्यासाठी पक्षाकडे नक्की मागणी करेन, असे पवार यांनी सांगितले.
थोरातांना टोला – रमेश थोरात यांना शेवटची संधी म्हणून दौंड विधानसभेचे तिकीट दिले. तसेच निवडणुकीवेळी अजित पवार यांची सभा ठेवा असे थोरातांना सांगितले होते. मात्र, ते म्हणाले की दादा आपण निवडून येतो काही काळजी नाही सगळी तयारी झाली आहे, असे सांगितले. तरी ते अवघ्या 673 मतांनी पडले. आप्पा अजित पवारांच्या सभेने 673 मते फिरू शकतात हे राज्याला माहित आहे. तुम्ही ती ठेवली नाही अन् पडले. जर तुम्ही माझी सभा ठेवली असती तर पुष्पगुच्छ देऊन तुमचा सत्कार करण्याची वेळ आली असती, असे अजित पवार यांनी स्पष्ट करून रमेश थोरात यांना टोला लगवाला.