योजनेचे काम सुरू…
पाणी योजनेतील मौजे टिटेघर येथे 700 मिटर व वडतुंबी येथे 1000मिटर लांबीच्या चारी खोदाईचे काम सुरु करण्यात आले असून यासाठी 160 एम.एम. म्हणजेच 16 से.मी.(6.29 इंच)ची पाइपलाइन यांत्रीकी विभागाच्या सल्ल्यानुसार वापरली जाणार आहे. यासाठी 75 अश्वशक्तीचा एक व 55 अश्वशक्तीचा एक असे दोन पंप वापरात आणले जाणार आहेत.
भोर -वाई तालुक्यातील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यावर टिटेघर-कोर्ले-वडतुंबी या उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात झाल्याने हे पाणी भोरमध्ये आणण्याकरीता आमदार संग्राम थोपटे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याने या पाण्यावर तालुका हिरवागार होणार आहे. उजवा कालवा व डावा कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे तालुक्यातील सुमारे 1050 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. भोर तालुक्याच्यादृष्टीने धोमबलकवडीच्या पाण्याला मोठे महत्त्व आहे.
धोमबलकवडी धरणाचे पाणी भोर तालुक्यातून कालव्याद्वारे जात असल्याने या पाण्याचा लाभ तालुक्यातील चाळीसगांव आणि वीसगांव खोऱ्यातील शेतकऱ्यांना होण्यासाठी आमदार थोपटे यांच्या सातत्याने प्रयत्न आहेत, याकरीता जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा होत असून आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या धरणाचे पाणी भोरला मिळणारच, अशी अशा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.
धोमबलकवडी प्रकल्प 1995-96 मध्ये झाला. या योजनेतील मौजे टिटेघर-कोर्ले-वडतुंबी या उपसा सिंचन योजनेला मंजूरी मिळाली आहे. या बरोबरच वेनवडी उपसा सिंचन योजनेलाही मंजूरी असून या दोन उपसा सिंचन योजनांच्या पाण्यावर तालुक्यातील एक हजार 50 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यात टिटेघर, वडतुंबी आणि कोर्ले या तीन गावांचे 302 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. महसुली क्षेत्रांपैकी 75 टक्के क्षेत्राला या पाण्याचा लाभ होणार आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.