पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे गेल्या अकरा महिन्यांत शहरात साथीच्या आजाराचे 80 हजार 725 रुग्ण आढळले असून, अनेकांना प्राण गमाविण्याची वेळ आली आहे. आज थेरगाव येथील बालकाला आरोग्य विभागाच्या दुर्देवी कारभारामुळे आपला जीव गमाविवा लागला आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
याबाबत भापकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागारांचे भ्रष्ट कोंडावळे निर्माण झाल्याने स्मार्ट सिटीऐवजी हे शहर वेस्ट सिटी बनले आहे. साथीच्या आजारामुळे पडवळनगर, थेरगाव येथील दोन चिमुकल्यांचा प्राण गेला आहे. सध्या शहरातील 236 जणांना डेंग्युची लागन झाली आहे. तर 3344 जणांना डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाली आहे. पालिकेच्या निष्क्रीयतेमुळे हे सुरू आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कारवाई करावी.