शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी तसेच परिसरातील काही गावात डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले आहे . बालमटाकळीच्या गणेश पांडूरंग वैद्य (वय १६ ) या इयत्ता १०वीच्या विद्यार्थीचे या आजाराने नुकतेच निधन झाल्याची घटना घडली. परिसरातील खासगी रुग्णालयात काही डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असल्याने येथे घबराटीचे वातावरण पसरले आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप घुले यांच्यासह आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविकांचे पथक बालम टाकळीत दाखल झाले . त्यांनी युद्धपातळीवर घर सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. साठविलेल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी नगरला पाठविले आहेत. गावात फॉगिग मशीनच्या सहाय्याने फवारणी मोहीम राबविली जात आहे..
अवकाळी पावसामुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असून घरात साठवलेले पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोअर टाकून , तुरटी फिरवून उकळून गार केलेले पाणी पिण्यासाठी वापरण्याबाबत प्रबोधन केले जात आहे.
नवनिर्वाचित सरपंच डॉ. राम बामदळे, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, विठ्ठलराव देशमुख, भारत घोरपडे, बंडू शिंदे,वाल्मिक सुळे आदी मदतकार्यात योगदान देत आहेत. सध्या बोधेगाव बालमटाकळीसह ७ गावच्या नळपाणी पुरवठा योजनेतून १५-२० दिवसांतून पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाणी साठवून पिण्यासाठी वापरावे लागते . त्यातच परिसरात डेंग्यू सदृश आजाराची साथ सुरू झाल्याने सार्वजनिक स्वच्छता व जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.