आर्थिक ध्येय निश्चित करण्यासाठी काही मंडळी घर खरेदी लवकर करण्याबाबत आग्रही असतात. अर्थात घर खरेदीचा निर्णय हा मोठा असतो. म्हणूनच खूपच कमी मंडळी करियरच्या सुरुवातीला घर खरेदीचा विचार करतात. मात्र कमी वयात म्हणजेच 20 ते 30 वर्षात जर घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे फायदे आणि नुकसान या दोन्ही बाजू पडताळून पाहणे गरजेचे आहे.
– जगदीश काळे
ज्या मंडळींनी करियरला नुकतीच सुरवात केली आहे, त्यांच्यासाठी घर खरेदी हे मोठे आव्हान असते. त्यामुळे ते भाड्याच्या घरात राहत असतात. कालांतराने जसजसे उत्पन्न वाढत जाते, तसतसे भाड्याची रक्कम वाचवून त्यातून घराचा हप्ता भरता यईल का असा विचार केला जातो. काही मंडळी आर्थिक ध्येय निश्चित आणि सुरक्षित करण्यासाठी घर खरेदी लवकर करतात. अनेकांसाठी घर खरेदी हा मोठा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याने लवकरात लवकर हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कामाला लागलेले असतात. त्याचबरोबर घर खरेदीचे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर अन्य ध्येयाकडे लक्ष देता येईल, असाही विचार केला जातो. काहींसाठी घर खरेदी अडचणीची ठरू शकते. कारण जबाबदारीचे प्रमाण अधिक असेल तर ती पार पाडताना घराचे हप्ते नियमित भरणे होईल का? असा विचार मनात येतो. ज्या मंडळींचे उत्पन्न चांगले आहे आणि बॅकअप चांगला आहे, अशी मंडळी सहजपणे कर्जाचा हप्ता भरु शकतात.
फायदे काय – करियरच्या सुरवातीला घर खरेदी केल्याने अनेक फायदे होतात. निवृत्त होण्यापूर्वीच आपण कर्जमुक्त होऊ शकतो. तोपर्यंत मालमत्तेची किंमत ही चांगल्या रितीने वाढलेली असते. निवृत्तीच्या वेळी आपल्या डोक्यावर कर्जाचे ओझे नको, अशी काहींची भावना असते. भाड्याने राहिल्यास आपल्याला दरवर्षी घर बदलण्याची वेळ येते. जर आपण कमी वयात गृहकर्ज घेतले तर प्राप्तीकरात सवलत मिळते आणि करही जादा मिळण्याची शक्यता वाढते. वाचलेला पैसा हा अन्य गुंतवणुकीत वळवता येतो. या मदतीने आपण कर्जाची परतफेड करु शकतो. आयुष्यात लवकर घर खरेदी करण्याचा निर्णय योग्य असला तरी आव्हाने आणि जोखीमही असतात. साधारणपणे वयाच्या तिशीत घर घेतल्यास 50 च्या आत कर्जमुक्त होणे गृहित धरले जाते.
आर्थिक शिस्त गरजेची – जर करियरच्या सुरुवातीलाच आपल्याला घर खरेदी करायचे असेल तर आपल्यावरच्या आर्थिक जबाबदारीचे आकलन करायला हवे. त्याचबरोबर आपण जबाबदारी पेलण्यासाठी किती तयार आहात, याचाही अंदाज बांधता येतो. या मार्गावर जाण्यापूर्वी आपण संपूर्णपणे आर्थिक शिस्त बाळगणे गरजेचे आहे. बॅंकेच्या कर्जाचा हप्ता भरण्याबरोबरच अन्य खर्च कसे भागवणार याचे गणित करता येते. यासाठी आर्थिक शिस्त आणि नियोजन करणे आवश्यक आहे.
कमी वयात घर खरेदी करण्याचा तोटा – लवकर घर खरेदी करताना अनेक आडाखे मनाशी बांधलेले असतात. नोकरीच्या काळातच कर्जाचा कालावधी संपवावा असा यामागचा हेतू असतो. यात अडचणी देखील येऊ शकतात. काही कारणांमुळे नोकरी सोडण्याची वेळ आल्यास किंवा गमावण्याची वेळ आल्यास हप्ता भरण्यास अडचणी येऊ शकतात. जर आपण तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा हप्ता भरु शकला नाही तर आपले कर्ज एनपीएमध्ये जावू शकते. त्यानंतर रिकव्हरीबाबत बॅंकेकडे अनेक अधिकार असतात. त्यात आपल्या मालमत्तेच्या लिलावाचा देखील समावेश असतो. यातून क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नियोजन न करता निर्णय घेतल्यास आर्थिक गणित कोलमडू शकते.
डाऊनपेमेंटचे नियोजन आणि त्याशी निगडीत आर्थिक घटकांचा दबाव वाढत जाईल आणि त्यामुळे महत्त्वाचे खर्च हे अडचणीत येऊ शकतात. जर व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने अन्य शहरात जाण्याची वेळ आली तर हप्ता आणि भाडे असे एकत्र भरताना दमछाक होऊ शकते. त्यामुळे कमी वयात घर खरदी करणे अडचणीचे ठरु शकते. त्यामुळे घर खरेदी करताना किंमान दहा वर्षाच्या आर्थिक खर्चाचा अंदाज घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच निर्णय घ्यावा. अर्थात जोखीम घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. घर खरेदी ही जोखीम असली तरी ती पत्करणे गरजेचे आहे. जर चांगल्या आर्थिक स्थितीची वाट पाहत बसलो आणि चांगली संधी येऊनही जोखीम घेतली नाही तर पश्चातापाची वेळ येऊ शकते.