तीन हजार तरुणांना मिळणार दिलासा
मुंबई – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मागील दहा दिवसांत पाच प्रकणातील खटले मागे घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांवर दाखल असलेले २८८ गुन्हे रद्द करण्याची विनंती स्थानिक न्यायालयांना केली आहे. या निर्णयामुळे सुमारे तीन हजार आंदोलक युवकांना दिलासा मिळणार आहे.
माहितीनुसार, मराठा आंदोलनाशी संबंधीत ३५ खटले मागे घेतले जाऊ शकत नाहीत. कारण यामध्ये आंदोलनादरम्यान ५ लाख रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये पोलीस आणि सरकारी कर्मचारी जखमी झाले होते. परंतु, अन्य गुन्ह्यासाठी सरकारने जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस आयुक्त यांच्यामार्फत स्थानिक कोर्टांकडे शिफारस पाठवली आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारने आतापर्यंत मेट्रो कारशेड, नाणार प्रकल्प, कोरेगाव भीमा हिंसा, शेतकरी आंदोलन आणि मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील खटले मागे घेतले आहेत.