“बीएसएनएल’चे 82 हजार कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणार
पुणे -“बीएसएनएल’कडे सध्या दीड लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी तब्बल 82 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्याचबरोबर आणखी 6 हजार कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात या कंपनीला कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू शकतो.
ही बाब लक्षात घेऊन कंपनीने दूरसंचार विभागाला अधिक वरिष्ठ तांत्रिक अधिकारी उपलब्ध करण्याचा आग्रह केला आहे. तरच आगामी काळात कंपनीला सुरळीत सेवा देता येणार आहे. कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी दूरसंचार विभागाने इतर सरकारी कंपन्यांमध्ये डेप्युटेशनवर पाठवले आहेत. ते अधिकारी परत कंपनीकडे पाठवावे, असे “बीएसएनएल’ने म्हटले आहे. 3 डिसेंबर रोजी स्वेच्छानिवृत्ती घेण्याची मुदत संपली त्या तारखेपर्यंत “बीएसएनएल’च्या 78 हजार कर्मचाऱ्यांनी तर, “एमटीएनएल’च्या 14 हजार कर्मचाऱ्यांनी मुदतपूर्व निवृत्तीसाठी इच्छा व्यक्त केली आहे.
मात्र, एवढे कर्मचारी निघून गेल्यानंतर म्हणजे जानेवारीनंतर देशभरातील काम नियमित ठेवण्याचे आव्हान “बीएसएनएल’ आणि “एमटीएनएल’च्या व्यवस्थापनासमोर निर्माण झाले आहे. या कंपन्यांकडे गरजेपेक्षा भारत जास्त कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या पगारावर जास्त खर्च होत होता. त्यामुळे कंपनीला नियमित पगार करता येत नव्हते. त्यानंतर ही कर्मचारी संख्या कमी करण्यासाठी सरकारने स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी निधी उपलब्ध केला आहे. मात्र, जास्त प्रमाणात कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे पहिले काही महिने तरी या कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्याचबरोबर स्वेच्छानिवृत्तीच्या अटी आणि शर्थिबाबत काही कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात आंदोलन सुरू केले आहे. जर या अटी अपेक्षेप्रमाणे शिथिल केल्या नाही तर, कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती प्रस्तावापासून माघार घेतील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.