महेश जाधव
मायणी – जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षांच्या प्रतवारीवर होणार असल्यामुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसणार आहे. महाराष्ट्रात द्राक्ष पंढरी अशी ओळख असणाऱ्या कलेढोण, मायणी परिसरातील द्राक्षांना ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. महिनाभरापूर्वीच कलेढोण, मायणी आणि परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.
या नुकसानीतून द्राक्ष उत्पादक सावरत असतानाच पुन्हा अवकाळीने तोंड वर काढले असून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा द्राक्षावर संकट येते की काय अशी स्थिती निर्माण झाली असल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सध्या मायणी, कलेढोणसह परिसरात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यातच मंगळवारी हलक्या सरी कोसळल्या आहेत. शिवाय अजून एक-दोन दिवस पावसाचे वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या अनेक बागा फुलोऱ्यात व काढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ढगाळ वातावरण आणि वाढत्या थंडीचा द्राक्ष मण्यांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे आधीच ओल्या दुष्काळाने पिचलेल्या बळीराजासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. सध्याच्या ढगाळ वातावरण व थंडीमुळे द्राक्ष घडावर बुरशी व डावण्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.
कलेढोण, मायणी व परिसरामध्ये हजारो एकर द्राक्ष बागायती क्षेत्र असल्याने द्राक्षांना जागतिक बाजार पेठेत मोठी मागणी असते. येथील हवामान द्राक्ष पिकांसाठी पोषक असल्याने येथील द्राक्षांचा दर्जा उच्च प्रतिचा असतो. जिल्ह्यात दिवसागणिक तापमानाचा पारा घसरत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाने खटाव तालुक्यातील बहुतांश भागातील द्राक्ष मण्यांना थंडीमुळे तडे गेल्याने शेतकऱ्यांना हुडहुडी भरली आहे.
ढगाळ वातावरण व थंडीमुळे द्राक्ष घडांवर बुरशी व डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी बागांवर डावण्या व बुरशीनाशकांची फवारणी करताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य प्रादुर्भाव आणि धुक्यामुळे संभवणारा रोगांचा धोका असे दुहेरी संकट शेतकऱ्यासमोर आहे. एकंदरीत सध्याच्या थंडीने व ढगाळ वातावरणाने द्राक्षबागा संकटात सापडलेल्या असून शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले असून त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हवामान बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असताना दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाल्याने पुन्हा द्राक्षांवर डावण्या आणि बुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने खर्चिक कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकरी, कलेढोण.