डोर्लेवाडी (वार्ताहर) –पंढरपूर, शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्रासाठी नजीकचा म्हणून बारामती- सोनगाव- वालचंदनगर या राज्य मार्गाच्या बीकेबीएन रस्त्याचा वापर अनेक प्रवासी करत असतात. यामुळे या रस्त्याने नियमित वाहतूक सुरू असते; मात्र हा नजिकचा असलेला रस्त्याची आता अपघाती मार्ग म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
बारामती ते वालचंदनगर रस्त्यावरील साइडपट्ट्यावर काटेरी गवत आणि वेड्या बाभळींनी कब्जा केला आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गाडी ओव्हरटेक करत असताना अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. यात अनेक जणांचे बळीदेखील गेले आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणांवर दोन्ही बाजूने काटेरी गवत आणि वेड्या बाभळी असल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. बारामती-वालचंदनगर या बीकेबीएन रस्त्यावर साइडपट्ट्यांवर वाढलेले काटेरी गवत, वेड्या बाभळी आणि रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तातडीने दुरुस्त करावेत. धोकादायक वळण असा फलक लावण्यात यावा तसेच रात्रीच्या वेळेस चमकणारे रिफ्लेकटर लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिक आणि वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनी बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे.
काम लवकरच होणार -अधिकारी
सासवड-जेजुरी ते बारामती-बावडा, नीरा नरसिंहपूर अशा चार पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झालेले आहे. हा रस्ता बांधकाम विभागाकडून हायब्रिड ऍम्युनिटीकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. सध्या याचे काम सासवड- जेजुरी, जेजुरी-बारामती आणि बारामती-नीरा नरसिंहपूर अशा टप्प्यामध्ये सुरू आहे. जेजुरी- बारामती, बारामतीपासून पुढे लवकरच काम सुरू होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम अधिकारी विश्वास ओव्हाळ, आणि अनिल गुजर यांनी सांगितले.