सातारा – सातारा पालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय नगरपालिका कार्यालय सोडून शिर्के शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरीत होणार आहे. येत्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देण्यात येणार असून शिक्षण मंडळाच्या स्थलांतरांसाठी 17 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
पालिका शिक्षण मंडळाच्या 17 शाळा व 92 शिक्षकांचा जामानिमा सांभाळण्यासाठी प्रशस्त कार्यालयाची आवश्यकता होती. राजवाड्याच्या दर्शनी भागातल्या इमारतीतील दोन दालनांमध्ये सभापती, उपसभापती, प्रशासन अधिकारी व तीन कर्मचारी, अशा सहा जणांचा संसार तब्बल 15 वर्षे सुरू होता. राजवाडा इमारतीचा काही भाग धोकादायक बनल्याने शिक्षण मंडळाचे कार्यालय 2016 मध्ये शाहू चौकात पालिका कार्यालयातील कमिटी हॉलच्या पलीकडील एका खोलीत स्थलांतरित करण्यात आले.
तेथे प्रभारी प्रशासन अधिकारी भांगे यांची बसण्याची स्वतंत्र सोय नसल्याने त्यांचा कारभार जिल्हा परिषदेच्या दालनातून सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांना अर्ज मंजुरीसाठी झेडपीत आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नगरपालिकेत जाण्याचा द्रविडी प्राणायम करावा लागत आहे. मात्र, हा आडवळणाचा प्रवास शिक्षण मंडळाचे पदसिद्ध सभापती व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे संपणार आहे.
गुरुवार पेठेतील सातारा पालिकेच्या शिर्के शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र दालनात शिक्षण मंडळाचे कार्यालय लवकरच स्थलांतरीत होणार आहे. शिक्षण मंडळासाठी मंजूर असलेल्या 40 लाख रुपये निधीपैकी कार्यालयाच्या व शाळेच्या बाजूने संरक्षक भिंत, फर्निचर, स्वतंत्र दालने, वॉटर प्रूफिंग, स्टेशनरी, संगणक यंत्रणा, बैठक व्यवस्था, अशा 17 लाख रुपयांच्या कामांना येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात येणार आहे.
अर्थात सभेचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. किशोर शिंदे यांचा कामाचा उरक दांडगा आहे; सत्ताधाऱ्यांची राजकीय मरगळं अजून गेलेली नाही. आधी नगराध्यक्षांची गैरहजेरी, नंतर राजकीय चाणक्यांच्या सूचना आणि त्यानंतर जमेल तशा कामाच्या टिप्पण्या दाखल करायची घाई, यामुळे वैतागलेले सभा सचिव अतुल दिसले हे गेले काही दिवस कोणालाच दिसलेले नाहीत. त्यामुळे शिक्षण मंडळाचे स्थलांतर लांबणीवर पडत आहे.
उदयनराजेंच्या सूचनेमुळे पालिकेत स्थलांतर
सातारा पालिकेत ज्या केबिनमधून शिक्षण मंडळाचा सध्या कारभार चालतो, ती केबिन सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे प्रमुख उदयनराजे भोसले यांची आहे. तेथे शिक्षण मंडळाचे कार्यालय करण्याच्या निर्णयाला प्रचंड विरोध झाला होता. मात्र, उदयनराजेंच्याच सूचनेमुळे शिक्षण मंडळाचे पालिकेत स्थलांतर झाले. उदयनराजे जेव्हा पालिकेत येतात, तेव्हा त्यांचे काम याच केबिनमधून चालते. त्यामुळे शिक्षण मंडळाचे स्थलांतर राजकीय हेतूने करण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.