शिराळा – बेकायदेशीर चालणाऱ्या ट्रॅव्हल्स, बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांच्या अनियमित वेळा तसेच महामंडळातील अंतर्गत राजकारण यामुळे शिराळा आगार तोट्यात आले आहे. यापूर्वी शिराळा आगारातून मुंबईसाठी सकाळी व सायंकाळी मिळून अशा दहा गाड्या मुंबईसाठी रवाना होत होत्या. मात्र, ट्रॅव्हल्सचा सुळसुळाट सुरू झाला जवळपास चाळीस ट्रॅव्हल्स दररोज शिराळा ते मुंबई असा प्रवास करत आहेत. तसेच तात्पुरता परवाना घेऊन वडाप वाहतूकही जोरात सुरू आहे.
चांदोली-शेडगेवाडी-मुंबई आणि मलकापूर – कोकरूड शिराळामार्गे मुंबई अशा चाळीस ट्रॅव्हल्सच्या गाड्यांनी एसटीचा महसूल पूर्णपणे बुडविला आहे. शिराळा बसस्थानकाची भव्य इमारत झाली. मात्र, आगाराचा परिसर पूर्णपणे उपेक्षित राहिला आहे. बसेस वेळेत न सुटणे, अचानक काही बसेस रद्द करणे यामुळेही प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महामंडळातील अंतर्गत राजकारणाचा फटका एसटीला बसत आहे.
या डोंगरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर मुंबईत वास्तव्यास असतात. त्यामुळे हे आगार तोट्यात आले आहे. आगाराकडे वरिष्ठ कार्यालयाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. येथील आगाराकडे मुबलक जागा आहे, वनराई आहेत. अद्ययावत असे बसस्थानक उभारण्यात आले आहे. स्थानक परिसरात मात्र डांबरीकरण झालेले नाही.
प्रवाशांना धुळीचा व खड्ड्यांचा त्रास होत आहे. त्याबरोबच विजेचीही सोय नाही. अचानक बस रद्द करण्यामुळे विद्यार्थी व प्रवासी वर्गाला त्रास होत आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या तालुक्यात प्रचंड आहे. दररोज 40 ट्रॅव्हल्स पूर्णक्षमतेने प्रवाशांनी खचाखच भरून मुंबईला जात असतात. त्यामुळे आगाराच्या तोट्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
शिवशाही सारख्या बस मुंबई मार्गावर सोडण्यात याव्यात. तसेच ट्रॅव्हल्सची बेकायदा होणारी प्रवासी वडाप वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी. त्यामुळे आगाराचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. यापूर्वी येथून बेळगाव-कर्नाटक -सोलापूर- जमखंडी- पंढरपूर आधी बसेस होत्या. त्या चांगल्या चालत होत्या. पण आगारातील अंतर्गत राजकारण व चुरस यामुळे शिराळा आगारातील बसेस बंद पडल्या आहेत.
काहींनी आगार बंद करण्याचा घाट घातला होता.परंतु प्रवाशांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. महामंडळाने तोट्याची कारणे शोधणे गरजेचे आहे. डोंगरी भागातील प्रवासी वर्गाचा विचार करून वेळापत्रक करावे, अशी मागणी होत आहे.
त्याचबरोबर आगाराच्या मुळावर उठलेली बेकायदा ट्रॅव्हल्स वाहतूक पूर्णपणे बंद करावी राजकारण थांबवावे म्हणजे शिराळा आगार नफ्यात येण्यास वेळ लागणार नाही. शिराळा येथून इस्लामपूर, सांगली, कराड ,कोल्हापूर आदी मार्गावर अनेक बसेस धावत असतात. या गाड्यांतून प्रवास करणारे पासधारक विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांचे पासेस बहुतांश इतरत्रच काढले जातात.
त्यामुळे शिराळा आगाराचे उत्पन्न इतर आगारांना मिळत आहे. शिराळा आगारात 66 बसेस व 3 मिनी बसेस आहेत. त्यांची परिस्थितीही धोकादायक आहे. बसेसचे वेळापत्रक व गरज यांची सांगड घालणे आवश्यक आहे. शिराळा आगार नफ्यात चालणे ही सामाजिक गरज आहे. बेकायदा ट्रॅव्हल्स व होणाऱ्या चुका याबाबत तातडीने हालचाली झाल्यास आगार नफ्यात चालणे कठीण नाही.