शिराळा – राज्यात आता महाविकास आघाडी हे शेतकरी हिताचे सरकार सत्तेवर आले आहे. ते शेतकरी, सहकारी संस्था व कारखानदारीच्या हिताचे निर्णय घेवून सर्व घटकांचा फायदा होईल, असे मत विश्वासचे उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर यांनी व्यक्त केले.
चिखली (ता. शिराळा) येथे विश्वास कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरूवात झाली. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात केंद्र व राज्य सरकारचे सहकारी साखर कारखानदारी बाबतचे धोरण उदासीन होते. अतिरिक्त साखर साठ्याचा प्रश्न गंभीर आहे. पंतप्रधानांच्या कृपेमुळे डिझेलचे दर भरमसाठ वाढले आहेत. परिणामी ऊस वाहतूक खर्चात वाढ झाली आहे.
शिल्लक साखरेचा उठाव होत नाही. साखरेचे बाजारातील दर व प्रत्यक्ष उत्पादनास येणारा खर्च याचा मेळ बसविण्यात कारखानदारांची कसरत होत आहे. एकूणच सहकारी साखर कारखानदारीपुढे अजूनही अडचणी खूप आहेत. सन 2018-19 च्या गळीत हंगामात विश्वासने एफ.आर. पी. ची सर्व रक्कम वेळेवर अदा केली आहे. 2019-20 मधील गळीत हंगामात विश्वास कारखाना उच्चांकी गाळप करेल.
तोडणी व वाहतूकची यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरली आहे. नोंदीनुसार तोडणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. ऊस उत्पादकांनी पिकवलेला सर्व ऊस विश्वास कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे. ज्यांनी शेतकऱ्यांनी अद्याप ऊसाची नोंद केलेली नाही, त्यांनी त्वरीत आपल्या विभागातील कारखाना गट ऑफिसशी संपर्क साधून नोंद करावी.
राम पाटील यांनी स्वागत केले. यावेळी सौ. सुनितादेवी नाईक, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग व मनिषादेवी नाईक, माजी सभापती ऍड. भगतसिंग नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंग नाईक, उपसभापती सम्राटसिंग नाईक, संचालक दिनकरराव पाटील, शिवाजीराव घोडे-पाटील, विजयराव नलवडे, बाबुराव नांगरे, मानसिंग पाटील, शामराव मोहिते, हंबीरराव पाटील, सुरेश पाटील, डॉ. राजाराम पाटील, विश्वास कदम, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय राणे, विश्वास पाटील, मानसिंग पाटील, यशवंत दळवी, निवास जगताप, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, भीमराव गायकवाड, बिरुदेव आंबरे, विष्णू पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, बाबासाहेब पवार, यु. जी. पाटील, अरुण साळुंखे, बाबासो पाटील, टी. एम. साळुंखे उपस्थित होते. तसेच शेतकरीही उपस्थित होते. सचिव सचिन पाटील यांनी आभार मानले.