हैदराबाद : हैदराबादेतील निर्भयाकांडांनंतर पोलिसांनी चार आरोपींना तातडीने अटक केली. मात्र त्याचे देशभर पडसाद उमटण्यास सुरवात झाली असून आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या आरोपींना पकडावे आणि त्यांना शिक्षा व्हावी म्हणून मी तेलंगणा सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. महिलांना अद्याप अशा क्रुरतेचा सामना करावा लागत आहे, हे चिंताजनक आहे. जिथे गरज भासेल तेथे हवी ती मदत केंद्राकडून देण्यात येईल. केंद्र सरकारच्या वतीने मी तेलंगणा राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलत आहे. तेलंगणाचे पोलिस महासंचालक आज दिल्लीत येत आहेत. ते माझी भेट घेतील. या गुन्ह्यात जे सहभागी असतील त्यांना समाजाने बहिष्कृत केले पाहिजे. त्यांचे वकीलपत्र कोणी घेऊ नये. महिलांविरूध्द होणारे असे गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अशी सुचना या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य सरकारांना करण्यात आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्य मंत्री जी किसन रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.
या घटनेने मला धक्का बसला आहे. हा अनुचित हिंसाचार भयानक आहे, या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना सोडू नये. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करावा आणि त्यांना शिक्षा होण्यात कसूर ठेवू नये, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
या घृृणास्पद घटनेचा मी तीव्र निषेध करते. या पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक पाठवण्यात आले आहे. याबाबात आयोगाच्या वतीने चौकशी समितीही नेमण्यात आली आहे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले.
या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न अभिनेत्री पायल रोहतगी हिने केला आहे. त्याचा समाज माधयमांतून तीव्र निषेध केला जात असून याबाबत हैदराबाद आणि मुंबई पोलिसांनी तिच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी केली आहे. एका मुलीचा अन्य धर्मीयांची अधिक वस्ती असलेल्या भागात सामुहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचे ट्विट तिने केले आहे.
निर्भयाबरोबर जे घडले ते ऐकून मला धक्काच बसला. मी अत्यंत अस्वस्थ आहे. हे माझ्या देशात घडतंय याचा मला विलक्षण राग येतोय. माझे रक्त खवळून उठतेय. अशा घृणास्पद गुन्ह्यासाठी बलात्कारी आणि खुन्यांना गंभीर शिक्षा व्हायला हवी. निर्भयाला श्रध्दांजली, असे अभिनेता करणवीर बोहराने म्हटले आहे.
मला खूप दु:ख झाले, राग आलाय आणि असहाय्यतेची जाणीव होत आहे. आपल्या सगळ्यांचा सामुहिक राग या निर्भयाला न्याय मिळवून देईल. पण, महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक पावले उचलायला हवीत. मला वाटतं महिलांना मोकळेपणाने आणि बिनधास्त फिरता आले पाहिजे. तरी मी तुम्हाला सर्वांना सुरक्षेचे प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आवाहन करत आहे. काय बोलावे मला सुचत नाही. एका बाजूला त्या निर्भय मनाने फिराव्यात असे माल वाटते त्याचवेळी मनात त्यांच्या सुरक्षिततेची चिंता सतावते, असे अभिनेता अल्लू शिरीषने म्हटले आहे.
ही घटना समजल्यापासून मी किती अस्वस्थ आहे, हे तुम्ही समजू शकणार नाही. मी माझ्या भगिनींना निवेदन करतो की अडचणीत सापडल्यास त्यांनी पोलिसांची मदत घ्यावी. लोकेशन ऍपचा वापर करून इमर्जन्सी ऍपचा वापर करावा. त्या निष्पाप आत्म्यासाठी माझी प्रार्थना. श्रध्दांजली निर्भया, असे ट्विट अभिनेता सुधीर बाबू याने केले आहे.