नगर – दुष्काळी परिस्थितीत उन्हाळ्याच्या सुटीतही शाळांतील मुलांना पोषण आहार शिजवून देण्याचा आदेश देण्यात आला; परंतु उन्हाळी सुटीत शाळेत पोषण आहार खाण्यासाठी विद्यार्थीच येत नसल्याची स्थिती जिल्ह्यातील शाळांमध्ये पाहण्यास मिळाली होती. असे असताना देखील उन्हाळी दीड महिन्याच्या सुटीत दोन कोटी 57 लाखांचा धान्यासह अन्य किराणा माल फस्त झाल्याचे सादर करण्यात आलेल्या बिलांवरून उघड झाले आहे.
गेल्या वर्षी पाऊस झाला नसल्याने राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती होती. दुष्काळाच्या झळा ग्रामीण भागात अधिक असल्याने ऐन उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुटीच्या कालावधीत शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला होता. यासाठी शाळांमधील शिक्षकांची ड्यूटीदेखील लावण्यात आली होती. म्हणजेच रोज सकाळी शाळेत जाऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार होते; परंतु कडक उन्हाच्या झळांमध्ये शालेय पोषण आहार खाण्यासाठी विद्यार्थ्यांचीच उपस्थिती लागत नसल्याची स्थिती जिल्ह्यात पाहण्यास मिळाली होती. त्यामुळे शालेय पोषण आहार शिजवून कोणाला खाऊ घालायचा, असाच प्रश्न उपस्थित केला जात होता.
विद्यार्थी नसताना पोषण आहार शिजला, दोन कोटी 57 लाख रुपयांचे बिल ठेकेदाराकडून सादर करण्यात आले आहे. मग, हा पोषण आहार खाल्ला कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागात शालेय पोषण आहार सुरू करण्यात आल्याबाबत त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारणार करण्यात आली होती. परंतु त्यांनी शाळांना सुट्या असल्याने विद्यार्थी शाळेत येत नाही. मग आहार कोणाला देणार, असा सवाल करून शालेय पोषण
आहार शिजविला जात नसल्याचे कबुली दिली होती. पण आता ठेकेदाराने गेल्या महिन्यात उन्हाळ्याच्या सुटीत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना खाऊ घातल्याचे या बिलावरून दिसून येत आहे.
यावेळी शिक्षक संघटनांनी देखील प्रशासनाला सुटी असल्यामुळे विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे स्पष्ट करून शालेय पोषण आहार वाटपातून आपली सुटका करू घेतली होती. उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यातील तापमान 43 अंशांवर पोचते. या कडक उन्हात पोषण आहार घेण्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थितीच लागली नाही. आहार शिजविण्याच्या नावाखाली आणि शाळेत खोटी पटसंख्या दाखवून न शिजविलेला आहार कागदावर आला. अर्थात, कागदोपत्री विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवून आहार शिजविल्याचे दाखविण्यात आले.
चार लाख विद्यार्थ्यांना दिला आहार
दुष्काळग्रस्त व टंचाईग्रस्त गावांमध्ये शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आल्याचे ठेकेदाराने दिलेल्या बिलावरून स्पष्ट होते. जिल्ह्यात सुमारे 3 हजार 937 शाळांमधील 3 लाख 95 हजार 449 विद्यार्थ्यांनी आहार फस्त केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात पहिली ते पाचवीचे 2 लाख 42 हजार 119, तर सहावी ते आठवीचे 1 लाख 53 हजार 330 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. नगर शहर म्हणजे महापालिका हद्द वगळता सर्व तालुक्यांतील शाळांमध्ये आहाराचे वाटप केल्याचे सांगण्यात आले आहे.
दुष्काळाची तीव्रता कमी पण विद्यार्थी जास्त
जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जास्त असलेल्या तालुक्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम. पण ज्या तालुक्यांत तीव्रता कमी आहे, त्या तालुक्यांत मात्र शालेय पोषण आहार खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आढळून आली आहे. अकोलेमध्ये 28 हजार 489, नेवाशात 39 हजार 834, राहात्यात 34 हजार 50, राहुरीत 35 हजार 884 विद्यार्थ्यांची उपस्थिती दर्शविली आहे. पण ज्या तालुक्यांत टंचाई भीषण होती, त्या जामखेडमध्ये 18 हजार 658, नगरमध्ये 31 हजार 3, पाथर्डीत 31 हजार 207, शेवगावमध्ये 11 हजार 368 विद्यार्थी दर्शविण्यात आले आहेत.