कबीर बोबडे
नगर – चिमुकल्यांच्या खांद्यावरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आदेश काढले. त्या आदेशाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला. मात्र, विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे वाढत असल्याचे दिसून येत आहे. याकडे शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक यांचे दुर्लक्ष होत असून विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचे ओझे कायमच असल्याचे दिसत आहे.
दप्तराच्या ओझ्यासंदर्भात शासन, शैक्षणिक संस्था, शालेय प्रशासन व पालक यांच्यामार्फत संयुक्तिकरीत्या प्रयत्न केले जात असले, तरी अद्याप पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. अजूनही अनेक विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखाली दबले जात आहेत.
विद्यार्थ्यांनी सर्व पाठ्यपुस्तके सोबत ठेवावीत, असा काही पालकांचा आग्रह असतो. बहुतांश शाळांमध्ये शुद्ध पाणी (आरओ प्युरिफायर) उपलब्ध असतांनाही विद्यार्थ्याला पाण्याची बाटली दिली जाते. पाठपुस्तकासोबतच अन्य शैक्षणिक साहित्याच्या भारामुळे दप्तरांचे ओझे वाढत आहे. पाण्याची बाटली, डबा, रिकाम्या बॅगचे वजन साधारणत: एक किलो असल्याने शिवाय, वह्या-पुस्तके व साहित्य बॅगेत ठेवल्याने दप्तराचे ओझे वाढते.
जागतिक आरोग्य संघटनेने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात पाठीच्या मणक्याचे आजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बाबत नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हेच या शिक्षण संस्थांना कळेनासे झाल्याने पालकही हतबल झालेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्याच्या चिंतेमुळेंच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची वजनमर्यादा निश्चित करून मार्गदर्शक नियमावली कार्यान्वित केली आहे. मात्र, जिल्ह्यातील शाळा दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत.
पाठीवर सातत्याने दप्तराचे ओझे घेतल्यामुळे मुलांना कमी-अधिक प्रमाणात मान, खांदे, पाठदुःखी होत असल्याचे दिसून येते. ओझ्यामुळे पाठीला बाक येणे, मणक्याच्या आकारात बदल होणे, मान पुढे झुकलेली राहणे, असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येऊ नये, याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.
डॉ. राहुल पंडित, अस्थिरोग तज्ञ