हेमंत देसाई
महाराष्ट्रात राजकारणाचे महाभारत सुरू असतानाच, तिकडे मध्य प्रदेशात कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटरवरून आपली कॉंग्रेसी ओळख पुसून टाकली आहे. मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या वाढदिवसाला राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांनी शुभेच्छाही पाठवल्या नाहीत. म. प्र. मधील वीसपेक्षा जास्त खासदार व आमदार हे अज्ञातवासात गेले असून, या वृत्ताचा इन्कार शिंदे यांनी केला आहे.
मध्य प्रदेश कॉंग्रसमध्ये गटबाजी असल्याचे नवीन नाही. 2018 साली भाजपला टक्कर देऊन, विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने यश मिळवले. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनी कमलनाथ यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. शिंदे समर्थकांना ही गोष्ट रुचली नाही. आता जे आमदार-खासदार संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले आहेत, त्याचे रहस्य काय, याचा शोध घेतला जात आहे. ट्विटरवरून कॉंग्रेसचा उल्लेख टाळण्याचे कारण काय, अशी पृच्छा करता, ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, “एक महिन्यापूर्वीच मी ही गोष्ट केली. कारण माझा अगोदरचा बायोडेटा खूप प्रदीर्घ असल्याचे ट्विटर अनुयायांचे मत होते.’ त्यामुळे सार्वजनिक सेवक आणि क्रिकेटप्रेमी एवढीच ओळख त्यांनी ट्विटरवर ठेवली आहे. पण हे सव्यापसव्य करण्याऐवजी, त्यांना फक्त “कॉंग्रेस नेता’ अशी ओळख सांगता आली असती. कोण बेपत्ता आहेत, त्यांची नावे सांगा, अशा अज्ञातवासात गेलेल्या लोकप्रतिनिधींशी मी फोनवरून संपर्क करून देतो, असे शिंदे यांनी म्हटले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, संबंधित आमदार-खासदारांशी शिंदे यांचा संपर्क आहे किंवा ते त्यांच्या गोतावळ्यातील आहेत.
कमलनाथ यांची हकालपट्टी करून शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, अशी या लोकप्रतिनिधींची मागणी आहे. शिंदे हे राहुल गांधी यांच्या गटातील म्हणून ओळखले जातात. दिल्लीत राहुल यांचे कॉंग्रेसमधील ज्येष्ठांशी फारसे जमत नाही. ज्येष्ठांच्या दबावापोटीच राहुल यांनी कमलनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष झाल्या. त्यानंतर पक्षातील ज्येष्ठांचे वर्चस्व वाढले आणि शिंदे यांचे पक्षातील महत्त्व कमी झाले. महाराष्ट्रात कॉंग्रेसने शिवसेनेशी दोस्ती केल्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी त्यास निरोध केला. परंतु निरुपम यांच्या निष्ठावंतांना एकही तिकीट देण्यात आले नव्हते. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निरुपम यांना विरोध होत असूनही राहुल यांनी त्यांना त्या पदावर ठेवले होते. 18 नोव्हेंबर रोजी कमलनाथ यांचा 73वा वाढदिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व विविध पक्षांच्या अन्य अनेक नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला, असे प्रसिद्धहपत्रक कमलनाथ यांच्या कार्यालयाने काढले होते. यात अर्थातच राहुल वा प्रियंका यांचा उल्लेख नव्हता.
कमलनाथ सरकारविरुद्ध बराच दारूगोळा शिंदेसमर्थक पुरवत असल्याचा संशय आहे. परंतु अलीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याची टीका खुद्द शिंदे यांनीच केली. पूरग्रस्तांना मदत पोहोचली नाही आणि राज्यात अनेक ठिकाणी वीजकपात होत आहे, यावरूनही त्यांनी टीका केली. कमलनाथ यांनी बाहेरून होणारा सरकारमधील हस्तक्षेप थांबवावा, असे आवाहन गेल्या सप्टेंबर महिन्यात शिंदे यांनी केले होते. दिग्विजयसिंग हे राज्यात “प्रॉक्झी गव्हर्नमेंट’ चालवत आहेत, असा आरोप उमंग सिंघर या मंत्र्यांनी केला होता. वास्तविक कमलनाथ व दिग्विजयसिंग हे एकेकाळचे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर समीकरणे बदलली. कॉंग्रेसमधील बंडाळी वाढल्यास, त्याचा फायदा घेण्यासाठी भाजप टपलेलाच आहे.
मध्य प्रदेशात रा. स्व. संघ व भाजपची मोठी ताकद आहे. गेल्या 15 वर्षांत भाजपचेच सरकार होते. कमलनाथ सरकारला अल्पस्वल्प बहुमत आहे. त्यामुळे गटबाजी रोखणे, पक्षाचा विस्तार करणे आणि सरकार नीट चालवणे ही केवळ कमलनाथ यांचीच नव्हे, तर सर्वच नेत्यांची जबाबदारी आहे. पण मध्यंतरी काही मंत्री व कॉंग्रेसच्या आमदारांनी कसा भ्रष्टाचार केला आहे, याची एक ऑडिओ क्लिपच बाहेर आली होती. दारूच्या ठेकेदारांकडून हिरालाल अल्वा, राज्यवर्धन, उमंग प्रभृती आमदार दहा ते वीस लाख रुपये कसे घेत आहेत, याबद्दलचे उत्पादनशुल्क अधिकारी आणि व्हिसलब्लोअर यांच्यातील संभाषणाची ती क्लिप होती. हा जो व्हिसलब्लोअर होता, त्यानेच प्रकरण बाहेर काढले होते. ही क्लिप समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यावर मुख्य सचिवांना त्या अधिकाऱ्याची बदली करणे भाग पडले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेशही देण्यात आला. या अधिकाऱ्याची धार येथे नेमणूक करण्यात दिग्विजयसिंग यांचा हात असल्याचे बोलले जाते.
कमलनाथ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदही आहे. नवा प्रदेशाध्यक्ष नेमावा, अशी विनंती त्यांनीच श्रेष्ठींना केली आहे. या पदासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव चर्चेत येताच (लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता) अन्य नेत्यांनी त्यांच्या नावास विरोध केला. त्यानंतर नेते मंडळी परस्परांवर आरोप करत सुटली. तेव्हा जाहीररीत्या चिखलफेक करू नये, अशा सूचना कॉंग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी दिल्या होत्या. वास्तविक कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मध्य प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात अधिक लक्ष दिले पाहिजे. या लढतीत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांचे चिरंजीव अजयसिंग हेदेखील प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. पक्षातील ही ठाकूर लॉबी असून, त्यांना दिग्विजयसिंग यांचाही पाठिंबा आहे. तर शिंदे यांना अनेक मंत्री व आमदारांचे समर्थन आहे. राज्याचे गृहमंत्री व आदिवासी नेते बाला बच्चन यांनाही प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे. कदाचित कमलनाथ व शिंदे गट तडजोड म्हणून त्यांच्या उमेदवारीस पाठिंबा देऊ शकेल. या सगळ्यावरून, मध्य प्रदेश कॉंग्रेस गटबाजीने ग्रस्त आहे, हे स्पष्ट होते.