हडपसरपासून जेजुरीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था; पुलांच्या कामांसह रूंदीकरणही रखडले
सासवड (प्रतिनिधी) – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या हडपसर ते सासवड, जेजुरीपर्यंतच्या मार्गावर सध्या खड्डेच खड्डे पडले आहेत. दिवे घाटातील रस्त्यांची तर भीषण स्थिती आहे. मंगळवारी (दि.19) दिंडीला झालेल्या अपघातानंतर या मार्गावरील सुरक्षिततेचाही प्रश्न समोर आला असून या मार्गावरील अनेक कामे रेंगाळली असल्यानेही अपघात वाढ होत आहे. विशेष म्हणजे पालखी महामार्गाचे द्वारे असलेल्या हडपसर येथूनच हा मार्ग खड्ड्यात गेला आहे. याच कारणातून राज्यभरात पालखी मार्ग म्हणून ओळख असलेला हा रस्ता सध्या खड्डे मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. याबाबत प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष आहे.
सासवड-हडपसर मार्ग हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग म्हणून ओळखला जात असून, अलीकडेच या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असला तरीही या रस्त्याचे रुंदीकरण जेजुरीपर्यंत रखडले आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी तीन वर्षांपूर्वी शेकडो वर्षांची वृक्षांची तोड करण्यात आली. हडपसरपासून जेजुरीपर्यंत रस्त्यालगतचे शेकडो वृक्ष तोडण्यात आले; परंतु त्यानंतरही हे काम रखडलेले आहे. सध्या, हडपसर ते दिवे घाटदरम्यान अतिक्रमणे, वाहनांच्या दुतर्फा रांगा, खड्ड्यांचे साम्राज्य, अवैध पार्किंग, अनधिकृत होर्डिंग्ज यामुळे या पालखी महामार्गावर अपघात घडत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी हडपसर ते सासवड हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यामध्ये दिवे घाटाची चढाई हा एक अवघड टप्पा असला तरी या मार्गावर वारकऱ्यांना पालखी दरम्यान विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मार्गावरून वर्षभर सातत्याने छोटे-मोठे पालखी सोहळेही आळंदीकडे प्रस्थान ठेवत असतात. परंतु, मार्गाची अवस्था पाहता या मार्गावरील वारी सांप्रदायाकरीता अवघड ठरू लागली आहे. या मार्गावर असलेल्या तुकाईदर्शन ते फुरसुंगी रेल्वे उड्डाणपूलदरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे. याकरीता रुंदीकरणाला अडथळा ठरणारे वृक्ष तोडले आहेत. त्या ठिकाणी आरता हातगाड्या, दुकानदार आणि वाहने अशी अतिक्रमणं होऊ लागल्याने हा पालखी मार्ग अरूंद झाला आहे. त्यातही रस्त्यात खड्डेच खड्डे असल्यामुळे धुळीचा त्रासही वाहनचालक आणि स्थानिकांसह पायी दिंडीतून चालणाऱ्या वारकऱ्यांना होत आहे.
वारी काळात दिंडी या झाडांचे कोठेही पुनर्रोपन करण्यात आलेले नाही. यामुळे प्रवाशांसह वारकऱ्यांना ऊन, पावसात उभे रहावे लागत आहे. रुंदीकरणासह पुलांची बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून महिन्यांपासून बंद पडल्याने रस्त्याच्या बाजूला लावलेले लोखंडी पत्रे वाऱ्याने उखडून पडले आहेत. कोठेही सूचनाफलक व दिशादर्शक नसल्याने अपघात घडत आहेत.
पालखी मार्गावर अतिक्रमणं…
सासवड पालखी मार्गावर असलेल्या मंतरवाडी चौक ते ऊरुळी देवाची फाट्यादरम्यान कपड्याच्या गोडावूनवाल्यांनी भररस्त्यात मोठमोठे दुकानांचे बोर्ड लावून वाहतुकीस अडथळा केला आहे, तर या दुकांनांना स्वतंत्र पार्किंग नसल्याने खरेदीसाठी आलेली वाहने रस्त्यातच लावली जात आहेत. वारंवार तक्रारी करूनही बांधकाम खाते व पोलीस यंत्रणा कारवाई करताना दिसून येत नाही.