18 उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
अजित पवारांना अभिप्रेत असलेली उद्याने सापडणारच नाही
बारामती (प्रतिनिधी) – शहरातील उद्यानामुळे बारामतीच्या वैभवात मोलाची भर पडली असली तरी देखील सध्यस्थितीत; मात्र शहरातील उद्यानांची अवस्था अतिशय वाईट आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील उद्यानांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असला, तरी देखील अजित पवार यांना अभिप्रेत असलेली उद्याने बारामती शहरात शोधूनही सापडणार नाहीत. शहरातील उद्यानांची दुरवस्था होऊनही नगरपरिषदेच्या उद्यान विभाग; मात्र आजगरासारखा सुस्त पडून आहे. याबाबत बारामतीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बारामती शहरात जवळपास 18 उद्याने विकसित केली गेली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला सुरुवातीच्या काळात उद्यानांची निगा राखली गेली. त्यानंतर मात्र, उद्यानांच्या देखभालीकडे पूर्णता दुर्लक्ष झाले आहे. उद्यानांची बारामती म्हणून बारामतीची नवी ओळख होत असतानाच शहरातील उद्याने भकास होताना दिसत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. प्रभागातील स्थानिक नगरसेवकांना देखील याबाबत गांभीर्य नाही. त्यामुळे उद्यानांची दुरवस्था झाली असून नागरिकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केले आहे. शहरातील महत्त्वाचे समजले जाणारे बारामतीकरांची वर्दळ असलेले गुल पूनावाला उद्यानात गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. देखभाल व स्वच्छता नसल्यामुळे या परिसरात साप फिरत आहेत.
त्यामुळे भीतीपोटी नागरिकांनी उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. विवेकानंद नगर, साई गणेशनगर येथील छोट्या बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही बागांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते, त्याबागांमध्ये आता फक्त उद्घाटनाचे फलकच शिल्लक राहिले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या उद्यानाची देखील दुरवस्था झाली आहे.
43 कर्मचारी कार्यरत
शहरातील 18 उद्यानांसाठी महिला व पुरुष असे जवळपास 43 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये 10 महिला कर्मचारी तर 33 पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील उद्याने व वृक्षांना पाणी देण्यासाठी 7 टॅंकर उपलब्ध आहेत. काही वेळेस नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी देखील याच टॅंकरचा उपयोग केला जातो.
बारामती शहरात छोटी मोठी 18 उद्याने आहेत. या उद्यानाच्या कामासाठी नगरपरिषदेचे सहकर्मचारी तसेच ठेकेदार पद्धतीने ते 33 कामगार कार्यरत आहेत. उद्यानातील साफसफाईचे काम सुरु केले आहे. कसबा, म्हाडा, गरुड बाग, नाना-नानी पार्कमधील साफसफाई व स्वच्छता करण्यात आले आहे. शहरातील उद्यानांची संख्या पाहता मनुष्यबळ कमी पडत आहे.
– विजय शितोळे, उद्यान विभाग प्रमुख
या उद्यानांची दुरवस्था
हरिकृपा नगर येथील अहिल्यादेवी होळकर उद्यान, पूनावाला पार्क, वसंत नगर येथील बाग, पूनावाला बाग, कसबा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, साई गणेशनगर तसेच विवेकानंदनगर येथील बगीचा, वाघोलीकर पार्क, अकल्पित गार्डन.