मांजरवाडीतील आशा स्वयंसेविकांचा अभिनव उपक्रम
नारायणगाव (वार्ताहर) – मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी “वॉटर बेल’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. आशा स्वयंसेविका सुषमा मुळे, मनीषा गायकवाड, राजश्री थोरात यांच्या पुढाकाराने ‘वॉटर बेल’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी खेळण्याच्या आणि अभ्यासाच्या नादात किंवा अतिटीव्ही यामुळे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करत असतात. विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यावे आणि आजारांना दूर करावे यासाठी मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमाबद्दल सांगताना सुषमा मुळे म्हणाल्या की, विद्यार्थी पाणी कमी पीत असल्याने लहान मुलांमध्ये थकवा,अशक्तपणा, ऊर्जेची कमतरता, वजन वाढणे, श्वसनाचे आजार वाढण्याचे प्रमाण मोठे असल्याने शालेय जीवनातच पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून मुख्याध्यापक यशवंत गवारी व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने “वॉटर बेल’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याकामी त्यांना शिक्षक उषा गवारी , कमल वायाळ, पुष्पलता डोंगरे, मीनाक्षी राऊत, धनश्री दाते, आशा पाटील, शंकर सोनवणे, बबन सानप, संजय रणदिवे यांचे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमाबाबत गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांनी कौतुक
केले आहे.
पाण्याचे शारीरिक महत्त्व
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आशा स्वयंसेविका म्हणाल्या की, शरीराचा दोन तृतीयांश भाग पाण्याने बनलेला असल्याने रक्तामध्ये 83 टक्के भाग पाणी असते. शरीरात तयार झालेले टाकाऊ पदार्थ मुत्राद्वारे बाहेर टाकले जातात, त्यासाठी पाण्याची गरज असते. डोळे, तोंड, पचनसंस्था, सांधे, हाडामधील स्नायूबंधाचे काम नीट चालणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, ऑक्सिजन संपूर्ण शरीरात पुरविणे आदींसाठीही पाणी महत्त्वाचे आहे.
“वॉटर बेल’ उपक्रमांतर्गत आम्ही दिवसभरात नियमित सुट्ट्या सोडून तीन वेळा बेल देतो. सकाळी परिपाठ संपते वेळी विद्यार्थ्यांना सर्वांच्या समक्ष पाणी पिण्यास दिले जाते, नंतर लहान सुट्टीनंतर शाळा भरल्यानंतर आणि दुपारी पुन्हा लहान सुट्टीनंतरची शाळा भरल्यानंतर असे दिवसातून तीन वेळा शिक्षकांच्या समक्ष जाणीवपूर्वक पाणी पिण्यास देऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
– यशवंत गवारी, मुख्याध्यापक