नगर – श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात असलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून काल सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास शहरातील वॉर्ड-1 मधील हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. यात तिघे जखमी झाले, तर गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर पडल्याने दोघे जखमी झाले. जखमींवर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मंगळवार दि. 12 रोजी दुपारी घरासमोर मुलांचा गोंगाट सुरू असताना त्यांना रिजवाना फरीद शेख यांनी हटकले. या कारणातून शेजारी राहणाऱ्या रिजवाना शेख व मेहरून्निसा शेख यांच्या कुटुंबांत वाद झाले. हा वाद शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. याठिकाणी दोन्ही कुटुंबांच्या वतीने परस्पर तक्रारी दाखल केल्या.
दरम्यान, मेहरूनिसा हिने औरंगाबाद येथील नातेवाईक सय्यद मुजीब व शेख यांना बोलावून घेतले. ते औरंगाबादहून आल्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास या दोन्ही कुटुंबियांमध्ये पुन्हा वाद झाला. सय्यद मुजीब व शेख रफद यांनी त्यांच्याकडील गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात शरीफ, जमील व फरीद हे तिघे जखमी झाले.
सर्व जखमींना तातडीने येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेख रफद शेख रशीद (वय- 26, रा. औरंगाबाद), सय्यद मुजीब सय्यद मैनोद्दीन (वय-32, रा. अन्सार कॉलनी, गट 6, प्लॉट नं. 9, पढेगाव, ता.जि. औरंगाबाद) अशी आरोपींची, तर शरीफ रशिद शेख, जमील रशिद शेख अशी जखमींची नावे आहेत.