उड्डाणपुलासंदर्भात खा. विखेंनी घेतला आढावा
नगर – शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला बहुचर्चित उड्डाणपुलाचे भूसंपादन सुरू असून काही ठिकाणचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र, भूसंपादनाचा पूर्ण मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्तांनी खा. डॉ. सुजय विखे यांची भेट घेवून मागणीचे निवेदन देत लक्ष्य घालण्याची मागणी केली होती. यावर डॉ. विखे यांनी उड्डाणपूल संदर्भात आढावा बैठक घेतली. व तातडीने भुसंपादन करण्यास प्रशासनाला सुचना दिल्या.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता दिवाण, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन आदीसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे काम भूसंपादनामुळे रखडले आहे. तर काही स्टेशन रोडवरील व्यवसायिकांचे प्रचलित भूसंपादन कायद्यानुसार पूर्ण झाले आहे.
परंतु लोकप्रतिनिधी या नात्याने यासर्व प्रकल्पग्रस्तांना लाभ देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपदानाबाबत शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाल्यास प्रकल्पग्रस्तांना वाढीव 25 टक्के रक्कम मिळणार आहे. तसेच भूसंपादन मूल्यांकनाबाबत ठोस निर्णय घेतला जावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी डॉ. सुजय विखे यांच्याकडे केली. यामुळे वाढीव मोबदला व स्ट्रक्चर मूल्यांकन बाबत चांगला मोबदला मिळण्यासाठी वेळेत प्रकल्पग्रस्तांची सहमती पत्र आवश्यक आहे.