सुपा -पारनेर तालुक्यातील सुपा जिरायती पट्ट्यात रब्बी हंगामातील ज्वारी काढणीला सुरूवात झाली असून रान शिवारामध्ये भलरीचे सुर घुमू लागले आहेत. जानेवारी महिना सरल्यानंतर फेब्रुवारीमध्ये म्हणजे पौष मराठी महिन्याच्या शेवटी साधारणपणे ज्वारी काढनीला वेग येतो. संक्रांतीनंतर सुपा परिसरासह पारनेर तालुक्यात काढणीला सुरुवात झाली असून रान शिवारानी ज्वारी काढताना भल्लरीचे सुर ऐकावयास मिळत आहे.
ज्वारी या पिकाची काढणी ही तशी अवघड मानली जाते. शेताला खतपाणी चांगले असले तर ज्वारीचे तांटे उपटायला त्रास होत नाही, अन्यथा रान कडक झाले असल्यास ताटे उपटत नाही. बोटे कापने, फोड येणे, शिरळक भरणे असे प्रकार घडतात. यामुळे सद्य स्थितीत ज्वारी काढायला मजूर मिळत नाही. अलिकडे इतर पिकांच्या तुलनेत ज्वारीचे पीक घेणे मोठे जिकिरीचे झाले आहे.
बाजारभाव चांगला असला तरी ज्वारीची काढणी, काटणी, मळणी या गोष्टी थोड्या कष्टाच्याच झाल्या आहेत. त्यामुळे ज्वारी काढताना मजूर न मिळाल्यामुळे मित्र मंडळी नातेवाईक जमवून ज्वारी काढण्याचे काटण्याचे नियोजन केले जाते.
बहुतांशी ठिकाणी सावड करून उसनवारी करून ज्वारी काढली जाते. त्याला ग्रामीण भागात इंरजीक म्हणतात. भलरीच्या (पांरपरिक गीतावर) सुरावर ढोल ताशाच्या तालावर ज्वारी उपटली जाते.
सर्वजन मोठमोठ्याने गाणे म्हणत कामेही चांगली करतात. दुपारी शेतावर व रात्री घरी गोड तिखट जेवणाचा बेत आखला जातो. आज ऐकाकडे उद्या दुसऱ्याकडे असे नियोजन केले जाते. चालू वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने ज्वारी पिकाची वाढ चांगली झाली आहे. परंतु नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ढगाळ हवामान व धुकाट वातावरणाने पिकांना पाहिजे तशा दाणा भरला नाही. मागील काही वर्षांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे वैरणीचे (कडबा) भाव गगनाला भिडले होते. चालू वर्षी वैरणीचे उत्पादन चांगला प्रकारे होईल अशी अपेक्षा आहे.