तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे
जामखेड – तालुक्यातील रखडलेले क्रीडा संकुलाचे काम, बांधखडक रस्ता व्हावा व मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील गैरप्रकारांबाबत जामखेड तहसील कार्यालयासमोर तीन ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांवर नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आज तहसील कार्यालयासमोरील अवार चांगलेच गजबजले होते. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
ग्रामीण भागातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा असलेले क्रीडा संकुल मंजूर झाले आहे. मात्र संकुलाचे व बॅडमिंटन हॉलचे काम निधी अभावी रखडले आहे. त्यामुळे सदरचे काम त्वरित चालू करण्यासाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने लाक्षणिक उपोषणास करण्यात आले. या उपोषणास सूर्योदय ग्रुप, डॉक्टर आसोसिएशन, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काशीद, मनसेचे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, प्रा. मधुकर राळेभात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी पाठिंबा दिला. यावेळी प्रहार संघटनेचे जामखेड तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, मधुकर राळेभात, तालुका उपाध्यक्ष गणेश हगवणे, भीमराव पाटील, नय्यूम शेख, राहुल पवार, विनायक राऊत, अवधूत पवार आदींसह क्रीडाप्रेमी उपोषणात सहभागी झाले होते.
दुसरे उपोषण जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील रस्ता खुला करण्याबाबत स्वाभिमानी पक्षाच्यावतीने करण्यात आले. बांधखडक येथे रस्ता नसल्याने गावात एसटी बस येत नाही. तसेच रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाण्यास अडचण निर्माण होते. रेशनिंगचा माल गावात येत नाही. शेतमालाची वाहतूक करता येत नाही. रस्ता नसल्याने प्रशासकीय अधिकारी देखील गावात येत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे हा रस्ता तात्काळ खुला करण्याची मागणी स्वाभिमानी पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, सरपंच केशव वनवे, विजय वारे, मंगेश वारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिसरे उपोषण हे शहरातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या संबंधात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले. वसतिगृहात मुलींना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी हे उपोषण करण्यात आले.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुराजे मधुकर भोसले, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, नीलेश गायवळ, नगरसेवक महेश निमोणकर, सुनील जगताप, गणेश जोशी, सागर नेटके, शिवाजी खंडागळे, विनायक ढाळे, घनश्याम राळेभात, अक्षय घागरे, अमोल पाचंग्रे, जगन्नाथ म्हेत्रे आदी उपस्थित होते. या नंतर सायंकाळी तीनही उपोषणकर्त्यांना तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी येत्या आठ दिवसांत आपले प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तीनही उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.