सुनीता शिंदे
झुडपांचे साम्राज्य; वैद्यकीय अधिक्षकांची स्वच्छतेसाठी हाक
कराड – कराड पालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरात सर्वत्र स्वच्छता करण्यात येत आहे. महत्त्वाच्या ठिकाणांबरोबरच झोपडपट्टी परिसरातही पालिका कर्मचारी जाऊन स्वच्छता करत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. परंतु गत काही दिवसांपासून विधानसभा निवडणुका व दीपावलीच्या सुट्ट्यांमुळे पालिकेचे येथील स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. रुग्णालयाच्या आवारात वाढलेल्या झुडपांमुळे भटक्या व भूचर प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे येथील स्वच्छतेसाठी पालिकेने तात्काळ नियोजन करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांनी केले आहे.
वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कराड तालुक्यासह अनेक ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी येत असतात. येथे मिळत असलेल्या सुविधांमुळे तसेच मोफत व उत्तम दर्जाच्या उपचारांमुळे रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून रुग्णालयाची आतील स्वच्छता दैनंदिन केली जाते. मात्र रुग्णालय परिसरात वाढत असलेल्या झुडपांची स्वच्छता करणे त्यांना शक्य होत नाही. त्यासाठी सतत पालिकेचे सहकार्य घेतले जाते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी अडकल्याने तसेच त्यानंतर आलेली दीपावलीची सुट्टी यामुळे रुग्णालय परिसराची स्वच्छता होऊ शकली. परिणामी या परिसरात झुडपांचे साम्राज्य वाढले आहे.
गत काही दिवसांमध्ये डॉ. प्रकाश शिंदे यांनी याबाबतची माहिती पालिकेला लेखी व तोंडी स्वरूपात दिली होती. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पालिकेकडून स्वच्छतेचे काम लांबणीवर पडले. परिणामी या झुडपांमुळे साप, विंचू यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, रूग्ण यांच्यासह रुग्णालयाच्या पाठीमागे असणाऱ्या लोकवस्तीतील लोकांनाही त्याचा त्रास होवू लागला आहे. याबाबतची तक्रार रुग्णालयाकडे स्थानिकांनी केली असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
वास्तविक पाहता पालिकेने शहरात स्वच्छतेत सातत्य राखून शहराचा चेहरा बदलून टाकला आहे. गर्दीचे ठिकाण असणाऱ्या बसस्थानक परिसरातही स्वच्छता रहावी, यासाठी पालिकेचे नगरसेवक व अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन ठेकेदारास तंबी दिली आहे. शहरातील झोपडपट्टीच्या भागातही स्वच्छता रहावी यासाठी कर्मचारी प्रत्यक्ष त्या परिसरात जाऊन स्वच्छता व किटकनाशक फवारणी करत आहेत.
दीपावली काळात शहरातील बच्चे कंपनी व नागरिकांनी आतषबाजी करून आनंद साजरा केला. यावेळी शहरात आतषबाजीनंतर रस्त्यांवर साचलेला फटाक्यांचा कचरा तसेच विधानसभा निवडणुकीनंतर विजयी झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर केलेली गुलालाची उधळण यामुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालमय झाले होते. पालिकेने या स्वच्छतेला प्राधान्य दिले खरे परंतु उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण व परिसरातील नागरिक यांच्या आरोग्याचा विचार करून येथील वाढलेली झुडपे काढावीत, अशी मागणी होत आहे.