नवी दिल्ली : शिवसेनेने स्वीकारलेल्या आक्रमक आणि आग्रही भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत भाजपने तूर्त वेट अँड वॉचचे धोरण कायम ठेवले आहे. आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
सत्तावाटपाच्या सुत्रावरून टोकाचे मतभेद असल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यातील सरकार स्थापनेविषयीची चर्चा ठप्प आहे. समसमान सत्तापदांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला अडीच वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे. मात्र, त्या पदावरील दावा सोडण्यास भाजप तयार नाही. त्यातून सरकार स्थापनेविषयी निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे दृष्टीपथात नाहीत. त्यामुळे शिवसेना नेमकी कुठली पाऊले उचलणार आणि पुढील काही दिवसांत राजकीय स्थिती कुठल्या वळणावर असणार याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय भाजपने घेतल्याची माहिती त्या पक्षाच्या सुत्रांनी दिली.
भाजपने युतीधर्माचे नेहमीच पालन केल्याचेही ठसवण्याचा प्रयत्न त्या सुत्रांनी केला. त्यातून भाजपने महायुतीच्या सरकार स्थापनेची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेवर ढकलल्याचे स्पष्ट होत आहे. भाजप, शिवसेना आणि विरोधी पक्षांनीही अजून पत्ते खोललेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत नेमके काय घडणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.