मुंबई – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजपमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. अशातच आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असे वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी हीच तिढ्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकते. अशा प्रकारची स्थिती पुरोगामी महाराष्ट्रात यापूर्वीही कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेनेने ठरवले तर बहुमत सिद्ध करु शकते. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते.