मिथिलेश जोशी
इंग्लंडमधील औद्यागिक क्षेत्र असणाऱ्या इसेक्स भागात एका शीतगृह असणाऱ्या लॉरीत गारठून 39 जणांचा मृत्यू झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी चीनहून आलेल्या स्थलांतरीतांना अशा गोठलेल्या अवस्थेत मृत्यू यावा, यासारखी शोचनीय स्थिती नसेल. या घटनेने स्थालांतरीतांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले आहे.
मरण पावलेलेल सर्व जण बोचऱ्या थंडीत बेल्जियमहून समुद्रमार्गे ब्रिटनच्या किनाऱ्याला पोहोचले. तेथून ते एका शीतगृह असणाऱ्या लॉरीत बसले. नॉर्थन आर्यलॅंडमधून ही लॉरी होलीहेड मार्गे इसेक्स येथे पहोचली. तेथे या शीतगृह असणाऱ्या लॉरीची तपासणी करण्यात आली. तेव्हा 39 गोठलेले मृतदेह सापडले. अगदी कोणीही वाचले नाही. अत्यंत योजनाबध्दपणे स्थालांतरीतांना नेण्यासाठी आखलेला हा प्रवास होता. पण दुर्देव! हा प्रवासाचा शेवट अंतिम प्रवासापाशी झाला.
या साऱ्या प्रकरणाचा तपास सुरू आहेच. पण या निमित्ताने काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ते प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. हे मरण पावणारे कोण होते? ते स्वेच्छेने या शीतमोटारीत बसले होते का त्यांना बळजबरीने त्यात बसवले होते? या शीतपेटीत त्यांना बसवण्यास जबाबदार कोण? ते इसेक्सपर्यंत कोणत्या मर्गाने पोहोचले? ही गुलामांची तस्करी होती की स्थलांतरीतांचा इंग्लंडमधील बेकायदा प्रवेश होता?
एका सामुहिक हत्यांकांडाचा प्रश्नाची तड लावायची असेल तर या प्रशनांची उत्तरे मिळवायला लागतीलच. या चौकशीला मानवतेचा चेहराही द्यावा लागणार आहे. कारण स्थलांतरीतांचा प्रश्न याला जोडला गेला असण्याची शक्यता आहे. नव्या जागतिक अर्थव्यवस्थेचा मानवी तस्करी हा अविभाज्य भाग बनला आहे. स्थालांतरीतांमधील बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी काम करणाऱ्या इरगो या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माहितीनुसार, गेली पाच वर्ष दरवर्षी स्थलांतर करत असताना वाटेत मरण पावणाऱ्या किंवा बेपत्ता होणाऱ्यांची संख्या चार हजाराच्या घरात आहे. 2000 मध्ये एका कंटेनरमध्ये गुदमरून 58 चीनी स्थलांतरीतांचा मृत्यू झाला होता. अगदी गेल्या आठवड्यात बेल्जीयममधील झीब्रुगे येथे घडलेल्या घटनेसारखीच ही घटना.
2014 मध्ये तिलबुरी येथे एका कंटेनरमध्ये 36 पुरूष, महिला आणि बालके मरणासन्न अवस्थेत सापडली होती. प्रभावी शोधमोहीम आणि आणि व्यापक सरकारी जागरूकता असताना या घटना घडल्या होत्या. या तस्करांसाठी काम करणारे कंटेनर चालक हे अत्यंत प्रशिक्षित असतात. तपासणी नाक्यांना ते सहज गुंगारा देतात. तरीही तपासणी नाक्यांवर कडेकोट तपासणी होऊ लागल्याने मानवी तस्करांनी बंदरांपासून त्यांची वाहतूक केण्याचा नवा पायंडा पाडल्याचे काही घटनांवरून समोर येत आहे. तपासणी नाक्यावरील श्वानांना वास येऊ नये म्हणून हे कंटेनर हवाबंद केले जातात. त्यामुळे गुदमरून प्राण जातात. अशा न उघडकीला आलेल्या आणखी काही घटना असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
शीतगृह कंटेनरमधून माणसांचा प्रवास हा तर थोडीही माणुसकी असणाऱ्यांच्या कल्पने पलिकडची गोष्ट आहे. पण त्याचाही वापर केला जातो. का? तर ती काजीपूर्वक सील केली जात असल्याने त्याची तपासणी आतून होत नाही. अशा नरभक्षकांना शोधण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि याची तड लावण्याची आस असणारे अधिकारी आवश्यक असतात. मानवी तस्करीत सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा हाच त्यावर उपाय आहे. डोव्हरच्या घटनेने हा केवळ स्थानिक पातळीवर सोडवण्याचा प्रश्न नाही, हेच अधोरेखीत केले आहे. ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे, त्यामुळे त्यावर आंतरराष्ट्रीय उपाय योजना आवश्यक आहे.
दैन्य आणि गरीबीपासून सुटका करून घेण्यासाठी स्थालांतराचा हा प्रवास सुरू होतो. चांगले अन्न आणि उत्तम आयुष्य यांच्या दिशेने तो सुरू राहतो. त्यात असंख्य यातना असतात. असे गोठलेले मृत्यू असतात. गोठलेल्या मनाने ते पहातयचे नसतील तर पुन्हा एकदा जगाने ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान साऱ्या जगाला म्हणावे लागेल, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात…