बाबासाहेब गर्जे
ऍड. प्रतापराव ढाकणे होमग्राऊंडवरच झाले रन आऊट ः आ. मोनिका राजळेंचा विकासाच्या मुद्द्यावर विजय
पाथर्डी – शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुक्यातून घुले बंधूंनी राष्ट्रवादीचे उमेदवार ऍड. प्रताप ढाकणे यांच्यासाठी जोरदार बॅटिंग करून मताधिक्य दिले. मात्र पाथर्डीच्या पूर्व पट्ट्यातील स्वतःच्या होमग्राउंडवरच ढाकणे रन आऊट झाले. दांडगा जनसंपर्क व विकासाच्या मुद्द्यावर भाजपच्या आ. मोनिका राजळे यांनी सर्व जाती-धर्मांच्या मतदारांचा विश्वास संपादन करत 14 हजारांच्या फरकाने दुसऱ्यांदा मॅच जिंकली.
निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षांच्या समर्थकांकडून एकमेकांवर जातीयवादी प्रचाराचे आरोप करण्यात आले. जातीय आकड्यांची मोडतोड करून समर्थकांनी आपापल्या नेत्याच्या विजयाची गणितेही मांडली. मात्र निवडणूक निकालानंतर आलेल्या आकडेवारीवरून मतदारांनी जातीयवादाला मतपेटीतून मूठमाती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत मराठा व वंजारी समाजाचे प्रामुख्याने प्राबल्य आहे. मतदारसंघातील ओबीसी समाज स्व. गोपीनाथ मुंडे यांना दैवत मानतो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मोनिका राजळे यांचा मराठा चेहरा देऊन ओबीसी समाज त्यांच्या मागे उभा केला. राष्ट्रवादीकडून उभे असलेले चंद्रशेखर घुले यांना ना. मुंडे यांच्या फॉर्म्युल्यामुळे 53 हजारांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
या पराभवाचा वचपा काढण्यासाठी 2014 च्या निवडणुकीतील भाजपने वापरलेला फॉर्म्युला शोधून घुले बंधूंनी दोन पावले मागे घेतले. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी देऊन माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी आपली सर्व शक्ती त्यांच्या मागे उभी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला राजळेंना एकतर्फी वाटणारी निवडणूक घुले बंधूंच्या मुत्सद्दी डावपेचामुळे अटीतटीची बनली. शेवगाव तालुक्यातील घुले बंधूंनी प्रामाणिक काम करून मताधिक्य दिले. मात्र ढाकणे यांच्या पाथर्डीतील होमग्राऊंडवरच त्यांची निराशा झाली. पाथर्डीतील पूर्व पट्ट्यातून त्यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यात होता.
मात्र राजळे यांनी त्यात परिसरात मताधिक्य घेतल्याने ढाकणे यांना पराभव स्वीकारावा लागला. आपल्या 25 वर्षांच्या संघर्षाला न्याय द्यावा, या ढाकणे यांच्या आवाहनाला तरुण वर्गाने भरभरून साथ दिली. तरुणाईच्या प्रचारातील गोंगाटाने मतदारसंघ काकामय बनला. मात्र परंपरागत कमळाशी नाळ जोडल्या गेलेल्या तळागाळातील मतदारांपर्यंत ढाकणे पोहोचू शकले नाहीत. आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, या भीतीने विरोध करणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यात ढाकणे अपयशी ठरले. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांत त्यांचा मतदारसंघाशी तुटलेला संपर्कही त्यांच्या पराभवाला कारणीभूत मानले जातो आहे.
राष्ट्रवादीच्या लाटेमुळे व ढाकणे यांना एक वेळ संधी देण्याच्या प्रचारामुळे मतदार ढाकणेंकडे आकर्षित झाला. मात्र त्यांना मतदानपेटीपर्यंत पोहोचण्यात कार्यकर्त्यांची ताकद कमी पडली. या प्राथमिक कारणामुळे ढाकणे यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली, असे मानले जाते. मात्र त्यांनी दिलेली कडवी झुंज वाखाणण्याजोगी आहे. बिगरराजकीय नागरिकांचे कधी नव्हे एवढे पाठबळ ढाकणेंना मिळाले होते. मात्र थोड्या मताने झालेला पराभव समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे.
भाजपचे उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी विकासाच्या मुद्द्यावर केलेला प्रचार मतदारांना प्रभावित करणारा ठरला. नामदार पंकजा मुंडे यांच्या आवाहनाला साथ देऊन ओबीसी समाजाने पुन्हा मोनिका राजळेंना दिली. स्व. राजीव राजळे यांची प्रचारातील उणीव व महिला म्हणून राजळे यांची एकाकी झुंज मतदारांना भावनिक करून गेली. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील त्यांचा दांडगा संपर्क संकटकाळी उपयोगी पडला. गावागावात निर्माण केलेल्या विश्वासू कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर पाथर्डीत पंकजा मुंडे समर्थकांनी काढलेला मोर्चा राजळे यांच्या पथ्यावर पडला व अडचणीत सापडलेल्या राजळे 14 हजारांच्या फरकाने निवडून आल्या.
मतदार संघात निवडणूक प्रचारादरम्यान ढाकणेंना वंजारी समाजाची मते, तर राजळेंना मराठा समाजाची मते, अशी जातीयवादी आकडेमोड करून मतदारसंघात विजयाची गणिते मांडली जात होती. मात्र निवडणूक निकालानंतर आलेल्या आकडेवारीवरून मतदारांनी जातीवादाला मूठमाती दिल्याचे स्पष्ट झाले.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीचा निकाल शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारा होता. 2014 च्या निवडणुकीतील मताधिक्याच्या तुलनेत राजळे यांचे या निवडणुकीतील मताधिक्य घटले आहे.
पुढील काळात राजळेंना मतदारसंघ बांधणीकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे, तर ऍड. ढाकणे यांना त्यांच्या स्वतःच्या तालुक्यातूनच कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी अल्पमताने झालेल्या पराभवाने खचून न जाता सातत्य ठेवणे गरजेचे आहे. 98 हजार मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या कार्यकर्त्यांशी सातत्य ठेवून त्यांना आपली शक्ती वाढवण्याची या माध्यमातून संधी मिळवली आहे.