निशिकांत पाटील यांचा इशारा
इस्लामपूर – वाळवा तालुक्यातील दोन्ही कारखानदारांचा घडा आता भरला आहे. इस्लामपूरचे पाणी काय असते हे दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांनी दिला. तसेच शहरातील सर्व धर्म, जात, पात, पंथ एकसंघ झाले आहेत. 1978 ची पुनरावृत्ती करून ऐतिहासिक परिवर्तन करूया, असे आवाहन त्यांनी केले. इस्लामपूर येथील यल्लमा चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, शहरातील जनतेने दिलेला आशीर्वाद वाया जावू देणार नाही. मी आमदार झाल्यावर प्रत्येक माणूस आमदार असेल. अडीच वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात शहरातील मतभेद, मनभेद, दुभंगलेल्या मनांना एकत्र आणले. त्यामुळेच शहराचा, आपल्या घरातील माणूस आमदार झाला पाहिजे अशी भावना 164 वर्षातून पहिल्यांदाच झाली आहे. माझ्या संस्थेवर टिका करणाऱ्यांनी एखादी पिठाची गिरण तरी उभारली का? ज्यांना वॉर्डातून निवडून येता येत नाही त्यांना न बोललेलेच बरे.
सदाभाऊ मंत्रीपदाची प्रतिष्ठा खाली येईल असे वागू नये. तुमची घरे कुठे आहेत याची कल्पना मला आहे. 2014 साली सर्वपक्षीय उमेदवाराच्या एका सभेला तरी तुम्ही उपस्थित होता का? त्यामुळे तुमची विश्वासार्हता राहिलेली नाही. आता गौरवभाऊंना फसवलयं आगामी काळात गौरवभाऊ आपल्या स्टेजवर असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रसाद पाटील म्हणाले, इस्लामपूर शहराचा आमदार होण्याचा प्रथमच मान मिळत आहे. इस्लामपूर शहरातून भरघोस मताधिक्य द्या. यावेळी रावसाहेब पाटील, एल. एन. शहा, अशोक खोत यांची भाषणे झाली.