निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षच राहणार नाही
पुणे – काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे पैलवान होते, पण आता नाहीत. सध्या तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच ताकदीचे पैलवान उरले आहोत. त्यामुळे ही कुस्ती आम्हीच जिंकणार, अशा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केला. निवडणुकीनंतर राज्यातसुद्धा विरोध पक्षच राहणार नसल्याचेही भाकीत त्यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आठवले पुण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या चिन्हावर रिपाइंचे उमेदवार निवडणूक लढवतात, म्हणजे रिपाइं संपली असे होत नाही.निवडणूक आयोगाकडून आम्हाला चिन्ह मिळालेले नाही आणि कमळ हे सगळीकडे पोहचले आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेबांची रिपाइं आम्ही संपवलेली नाही, पण बाळासाहेब आंबेडकर यांनीच वंचित काढून रिपाइं संपवली आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात महायुतीला सध्या चांगले वातावरण आहे. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होत म्हणजे त्यांच्या जास्त जागा निवडून येतील असे नाही. नुसतीच भाषणे करुन विकास होत नसतो. मतदारांना हे समजते. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे आहेत, हे आता सिद्ध झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या जागा मिळतील, असे आठवले म्हणाले.
राज्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्री पद रिपाइंला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. त्याचबरोबर चार महामंडळे, मला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळावा, म्हणून मुख्यमंत्री प्रयत्न करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे माझ्यापेक्षा तुमच्या अधिक जवळचे आहेत, त्यामुळे तुम्हीच त्यांना सांगा. याशिवाय विधानसभेत रिपाइंचा स्वतंत्र गट स्थापन करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.