कराड – वनवासमाची (खोडशी, ता. कराड) हद्दीत एकाने पोल्ट्री सुरू केली आहे. या पोल्ट्रीतील कोंबड्या मेल्याने गावात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत सदरची पोल्ट्री बंद करावी असा पवित्रा घेतला. संबंधित व्यक्तीने पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासंबंधीचा कोणताही शासकीय परवाना न घेतल्याचे यावेळी उघडकीस आले.
वनवासमाची जुने गावठाण येथे राजेंद्र जाधव (रा. सैदापूर, ता. कराड) यांनी 2013 मध्ये पोल्ट्री इमारतीचे बांधकाम केले होते. ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही त्यांनी जबरदस्तीने सदरचे बांधकाम पूर्ण केले. परंतु पोल्ट्री सुरू केली नव्हती. 2013 ते 2019 पर्यंत ग्रामपंचायतीकडून पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये या इमारतीमध्ये साडेतीन हजार कोंबड्या आणल्या.
यानंतर ग्रामपंचायतीकडून दोनदा नोटीस देवून कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. वातावरणातील बदलामुळे या पोल्ट्रीमधील शेकडो कोंबड्या मरण पावलेल्या आहेत. तसेच कोंबड्यांच्या विष्ठेमुळे वनवासमाचीत प्रचंड दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांचा उद्रेक झाला. सर्व महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत मंगळवारी पोल्ट्रीवर धाव घेतली. गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना कल्पना दिली.
तीन तासांहून अधिक काळ लोटला तरी एकही अधिकारी याठिकाणी आले नाहीत. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला मोर्चा पोल्ट्रीकडे वळवला. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील व आरोग्य विभागाचे ए. बी. कोळी यांनी भेट दिली. संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले.