पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
नवी दिल्ली: ऊर्जा क्षेत्रात नैसर्गिक वायूचा आधार दुपटीने वाढवून 2030 पर्यंत तो 15 टक्के करण्यासाठी भारत नैसर्गिक वायुपुरवठा आणि वितरण पायाभूत क्षेत्रात सहा हजार कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
देशभरातील एकूण ऊर्जावापरात नैसर्गिक वायूचा 6.2 टक्के वापर केला जातो. केंद्र सरकार वायुआधारित अर्थव्यवस्था विकसित करण्यावर भर देत आहे. कार्बन उत्सर्जनावर होणारा खर्च वाचवण्यासाठी नैसर्गिक वायू महत्त्वपूर्ण साधन आहे. नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी भारतातील पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण अशी व्यापक जोडणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रोत्साहन दिले जात आहे, असे प्रधान यांनी सांगितले.
वायू पाईपलाईन, तसेच टर्मिनल पायाभूत विकास केला जात असून, त्यासाठी भारताने सहा हजार कोटी डॉलर्सची गुंतवणूक सुरू केली आहे. यातील बहुतांश प्रकल्प पुढच्या टप्प्यात किंवा पूर्णत्वास जात आहे. भारतातील 70 टक्के लोकसंख्येला वायुवितरण करण्याचे कार्य लवकरच पूर्ण होईल. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी आमचे सरकार धोरणात्मक भागीदारीच्या संधी शोधत आहे. देशातील ऊर्जा क्षेत्राची गरज पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रात देश आणि विदेशातील खाजगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असेही प्रधान यांनी यावेळी सांगितले.
आपले सरकार तेल आणि वायू क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सामरिक भागीदारी शोधत आहे. देशातील आणि परदेशातूनही भविष्यातील उर्जेच्या लॅंडस्केपसाठी आवश्यक असणारी गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आम्ही अलीकडच्या काळात विघटनकारी घडामोडी पाहिल्या आहेत. इराण आणि व्हेनेझुएलावर अमेरिकेने लादलेले निर्बंध, सौदी तेल प्रक्रिया करणाऱ्या केंद्रांवर हल्ले, होर्मूझ सामुद्रधुनीमधील अस्थिर परिस्थिती, मध्य-पूर्वेतील अशांतता आणि अमेरिका-चीन व्यापार युद्ध अशा काही घडामोडी पाहता, या क्षेत्रात आता नवी आव्हाने निर्माण झाली आहेत.
– धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री