मुंबई (प्रतिनिधी) – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याचा गेली चार वर्षे तपास करणारी एसआयटी तपासयंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यांच्याकडून आता तपास काढून घ्या आणि अन्य तपास यंत्रणेकडे सोपवा, अशी मागणी पानसरे कुटूंबियांनी आज उच्च न्यायालयात केली. याची गंभीर दखल न्यायालयाने जर तुम्हाला जर तपास यंत्रणा बदलायची असेल तर तसा रितसर अर्ज करा, असे निर्देश दिले. तर डॉ. नरेद्र दाभोलकर प्रकरणी सीबीआयला आरोपींनी हत्येसाठी वापरलेल्या हत्याराचे अवशेष खाडीपात्रातून शोधून काढण्यासाठी दोन आठवड्याची मुदतवाढ दिली.
कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्याराचे अवशेष खाडीपात्रातून शोधून काढण्यासाठी आणखी दोन आठवड्याची मुदत न्यायालयाकडे मागितली. तर पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीची तपासावर पानसरे कुटूंबियांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या चार वर्षांत तपास यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मुख्य आरोपींपर्यंत पोहचण्यास तपास यंत्रणेला अपयश आले आहे. आता या तपास यंत्रणेकडून तपास काढून घ्या आणि अन्य तपास यंत्रणांकडे तपास सोपवावा, अशी मागणी करण्यात आली. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.
अशा प्रकारे भर कोर्टात तपास यंत्रणा बदल्याची मागणी करून याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आणि कुटुंबियांनी स्वत:च्याच अडचणी वाढवून घेतल्या आहेत, असे स्पष्ट मत व्यक्त करून जर तुम्हाला तपास यंत्रणेकडून तपास काढून घ्यायचा असेल तर तसा रितसर अर्ज करा, असे निर्देश पानसरे कुटूंबियांना दिले.
तर आरोपीने खाडीत टाकलेले हत्यार शोधून काढण्यासाठी आणखी दोन आठवड्याची मुदतवाढ देताना न्यायालयाने आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी दिलेल्या वाढीव मुदतीपूर्वी हे हत्याराचे शोधकार्य संपवा, असा आदेश सीबीआयला देत याचिकेची सुनावणी दोन आठवडे तहकूब ठेवली.