अहमदनगर: सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांच रणशिंग शिगेला पोहचले आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वचजण प्रचार मग्न आहेत. त्या अनुषंगानेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेचे आयोजन अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यामध्ये करण्यात आले होते. यावेळी पवारांनी मधुकर पिचड यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे.
आदिवासींचा विकास करण्यासाठी पक्ष सोडून गेलो असे सांगतात, मग काय चाळीस वर्षे गवत उपटत होतात काय? असा टोला पवारांनी लगावला आहे.
अकोल्यातील या सभेत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय?, असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही हातवारे करत टीका केली. मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगले ठाऊक आहे. यांच्याशी काय कुस्ती खेळायची असं म्हणत त्यांनी पुन्हा हातवारे केले. समोर पैलवान नाही म्हणता, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय भंडारदरा धरण पहायला येतात का? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.