शेखर गोरे यांची टीका, शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल
गोंदवले – माणचे माजी आमदार स्वतःला जलनायक म्हणून माण खटावमध्ये पाणी आणलयं म्हणतात तर माण खटावमध्ये 83 पाण्याचे टॅंकर कसे सुरु होते? तर 97 गावांत पाणी पोहचवले म्हणतात तर ते गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करत निवडणुका आल्या की दुष्काळी भागात पाणी आणल्याचे नाटक करायचे, हे आता जनतेला समजले असून या निवडणुकीत जनतेने मला आशिर्वाद देवून विधानसभेत पाठवले तर शपथविधीनंतर आठ दिवसांत माण खटावचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी विधानभवनासमोर आंदोलन करणार असल्याची ग्वाही माण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांनी दिली.
विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दहिवडी येथील इंगळे मैदानावरील आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संजय भोसले, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुलाणी, युवराज पाटील, महिला तालुकाध्यक्ष पूनम माने, सौ. सोनलताई गोरे, सुरेखाताई पखाले, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार, पंचायत समितीचे उपसभापती नितीन राजगे, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, सौ. कविता जगदाळे, नगरसेवक धनाजी माने, संदीपशेठ घोरपडे, रंगकामगार सेनेचे कार्याध्यक्ष धनाजीराव सावंत, किसनराव नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शेखर गोरे म्हणाले, “”आजवर ज्या पक्षात गेलो तेथे अन्यायच वाट्याला आला. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणाऱ्या पक्षात मी प्रवेश केला. माजी आमदार म्हणतात मी माझ्या मतदारसंघात दहा वर्षांत विकास कामे करु शकलो नाही, म्हणून भाजपमध्ये जातोय. दहा वर्षात माण खटावमध्ये उद्योगधंदे आले नाहीत. त्यामुळे रोजगार नाही, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या नाहीत.
आजवर पाणीप्रश्नांवरच येथील निवडणुका लढल्या गेल्या. पण हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी प्रयत्न झाला नाही.” जनतेने आशिर्वाद द्यावा, तुमचे उपकार कधीच विसरणार नसल्याचे गोरे यांनी सांगितले. यावेळी संजय भोसले, सुरेखाताई पखाले, बाळासाहेब मुलाणी, धनाजी सावंत, संदीप घोरपडे, अंबादास नरळे, वैभव मोरे, अरुणा मोरे, कारभारी खाडे, काशीद मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. सभेनंतर शेखर गोरे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.