400 झाडांची कत्तल : 60 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : न्यायालयाच्या निर्णयानंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी मध्यरात्रीच सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री जवळपास चारशेहून अधिक झाडे कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचे हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होते. वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. आरेमध्ये रात्रभर पोलीस आणि आंदोलकामध्ये घमासाण सुरू होते. आंदोलन शांत करण्यासाठी आणि वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आंदोलकांनी आरेतील वृक्षतोड थांबवण्यासाठी रात्री तिथेच धरणे आंदोलन सुरू केले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले होते. आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांनी एक-एक करून आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तरीही अनेक आंदोलक आरेमध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी देत ठाण मांडून होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना परतण्याचे आवाहनही केले. अखेर रात्री तीन वाजेच्या सुमारास सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर आरेमध्ये पुन्हा झाडे कापण्यात आली. जवळपास 400 झाडांची रात्रीत कत्तल केल्याची माहिती समोर येत आहे.
आरे कारशेडच्या ठिकाणी मोठया प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू असताना ही घटना घडल्यामुळे पर्यावरण प्रेमींना धक्काच बसला. दरम्यान, वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय महापालिकेच्या वेबसाईटवर शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर किती दिवसांचा प्रतिक्षा कालावधी आहे , यावर बराच गदारोळ रात्री उशिरापर्यंत सुरू होता. याबाबतचा अहवाल लक्षात घेता कारशेडच्या मार्गात येणाऱ्या झाडांचे पुनरेपण करायचे की ती तोडायची याबाबत प्राधिकरणातील सदस्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसत नाही. किंबहुना पुनरेपण केलेली झाडे जिवंत राहण्याची शक्यता फारच धूसर होती. त्यामुळे झाडांच्या पुनरेपणावर पैसा खर्च करूनही ती मरणारच आहेत, तर ती तोडावीत हे तज्ज्ञांचे म्हणणे योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले.