मुंबई, दि. 2 – भाजप नेते आणि शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सातारच्या गादीसमोर कॉंग्रेसचे “पृथ्वीअस्त्र’ भयभीत होऊन पळाले, असा टोला त्यांनी लगावला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याने आशिष शेलार यांनी हा टोला लगावला आहे. भाजपाचे सारे विरोधक गारद झाले, असेही त्यांनी म्हटले आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जय जय महाराष्ट्र माझागर्जा महाराष्ट्र माझा! उदयनराजे छत्रपतींचे वंशज तुम्ही विरोधकांना पराभवाचे पाणी पाजा! सातारच्या गादीसमोर कॉंग्रेसचे “पृथ्वीअस्त्र’ भयभीत होऊन पळाले. भाजपचे विरोधक सारे गारद झाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणुकदेखील पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या उदयनराजेंविरोधात कॉंग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवणार अशी जोरदार चर्चा होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पृथ्वीराज यांच्या नावाचा आग्रह धरला असल्याचे सांगितले जात होते. पण तसे झालेले नसून पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केले. त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता उदयनराजे यांच्याविरोधात कोणता उमेदवार दिला जाईल याबाबत उत्सुकता वाढली आहे.