नवी दिल्ली : भारताला अतिरिक्त भूभागाची आकांक्षा नाही. आमची विचारसरणी इतरांवर लादण्याचीही आमची इच्छा नाही, अशी स्पष्ट भूमिका लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी बुधवारी मांडली.
एक शक्ती म्हणून उदयास येणारा जबाबदार देश म्हणून भारत आपल्या विभागीय आणि जागतिक सुरक्षाविषयक कर्तव्यांची पूर्तता करेल, असेही त्यांनी नमूद केले.
रावत मालदीवची राजधानी मालेमध्ये संरक्षण तज्ञांच्या कार्यक्रमात बोलत होते. ऊर्जासंपन्न पश्चिम आशियातील अस्थिरता जागतिक तणाव आणि अशांतता वाढवू शकते. अमेरिका आणि इराणमधील तणाव चिंताजनक आहे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी नामोल्लेख टाळून पाकिस्तानवर शाब्दिक तोफ डागली.
भारतीय सशस्त्र दलांना जम्मू-काश्मीरात दररोज छुप्या युद्धाचा मुकाबला करावा लागतो. शेजारील भागाकडून निर्माण होणाऱ्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्करी क्षमता वाढवण्याचा पूर्ण अधिकार भारताला आहे. दहशतवादाचा धोका हे संपूर्ण जगासमोरील मुख्य आव्हान आहे. जनसंहाराच्या शस्त्रास्त्रांचा प्रसार हेही आव्हान असल्याची भूमिका त्यांनी मांडली. आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत भारताने नेहमीच विधायक भूमिका निभावल्याकडेही रावत यांनी लक्ष वेधले.