आजपर्यंत आपण गुंतवणुकीवर अनेकप्रकारे चर्चा, सल्ला मसलत करत आलोय. आजच्या लेखात एक वेगळ्या गुंतवणूक प्रकाराबद्दल पाहुयात. इन्शुरन्स. थांबा.. ही गुंतवणूक म्हणजे परताव्याच्या अपेक्षेनं इन्शुरन्सपॉलिसीमध्ये केली जाणारी गुंतवणूक नसून आपल्या आर्थिक नियोजनातील एक गरजेचं, महत्वाचं परंतु तितकंच दुर्लक्षिलेलं अंग असून परताव्याची अपेक्षा न बाळगता यामध्ये गुंतवणूक करणं हीच आर्थिक नियोजनाची पहिली पायरी ठरते.ही अशी गोष्ट आहे की जेंव्हा त्याची तुम्हाला अजिबात गरज नसते तेंव्हा ती सहज मिळू शकते आणि जेंव्हा त्याची खरोखर गरज असते तेंव्हा तुम्हाला ती कधीच सहजासहजी मिळू शकत नाही. बहुतांशी लोक विमा व गुंतवणूक ह्या दोन वेगळ्या गोष्टींना एकच समजतात व फसवले जातात (युलिप अथवा ट्रॅडिशनल म्हटल्या गेलेल्या पॉलिसी टाळाव्यात).
ज्याप्रमाणं ‘वेल्थ’ या नावाखाली महागडी घड्याळं, महागड्या गाड्या अथवा महागडी पेंटिंग्ज देखील मोडतात आणि जरी त्यातून आर्थिक मोबदला मिळत नसला तरी त्या गोष्टी जवळ असणं हे श्रीमंतीचं लक्षण असतं. अगदी त्याचप्रमाणं ही गुंतवणूक परताव्यापोटी न करता मानसिक समाधानासाठीच केली जाते. याच समाधानासाठी आर्थिक पंचमहाभुतांवर विजय मिळवल्यास आर्थिक नियोजन हे उत्तम होतंचव आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ध्येयपूर्तीचं समाधान देखीलनक्कीच पदरात पडतं. आताही महाभूतं म्हणजे मृत्यू,आजारपण, अपघात, नैसर्गिक आपत्तिव इतर संकटं.
आयुर्विमा (टर्म इन्शुरन्स) : आपल्या जीवनसाथीवर व कुटुंबावर प्रेम करणारी कोणतीही व्यक्ती (नवरा असो व बायको) ही बेजबाबदार असूच शकत नाही. कुटुंबातील कमावणाऱ्या व्यक्तीच्या नसण्यानं त्याच्या उत्पन्नाएवढी रक्कम त्याच्या पश्चात त्याच्या जिवलगांना मिळणं इतकाच हेतू या विमा प्रकारचा असतो. ही रक्कमसाधारणपणे वार्षिक उत्पन्नाच्या १५-१६ पट असावी. उदा. मासिक उत्पन्न ५० हजार असल्यास (५०,०००x१२=६,००,०००x१६=९६लाख) याचं कारण हे मिळालेले विम्याचे ९६ लाख कोणतीही जोखीम न घेता राष्ट्रीय बँकेच्या मुदतठेव योजनेत गुंतवल्यास येणारं मासिक व्याज हे त्या व्यक्तीच्या मासिक उत्पन्नाएवढं येतं (९६,००,००० x ६.५% = ६,२४,०००/१२=५२,०००). हा विमा नोकरी लागल्याबरोबर अथवा लग्न झाल्याबरोबर लागलीच काढावा. मिळालेल्या आहेरातून प्रथम गुंतवणूक.
आयुष्यभरातील गुंतवणुकीला खिंडार न पडण्यासाठी (भाग-२)
आरोग्यविमा : अनेकदा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाचा खर्च आपली सर्व बचत व गुंतवणूकही घेऊन जातो आणि मग ज्या उद्दिष्टांसाठी ही गुंतवणूक केलेली असते त्यांच्याशी आपणांस तडजोड करण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. उदा. आपल्या लाडक्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आपण गेले २५ वर्षं पोटाला चिमटा घेऊन गुंतवणूक करत असतो परंतु अचानक उद्भवलेल्या हॉस्पिटलायझेशनमुळं त्यातील बहुतांशी रक्कम हॉस्पिटलचं बिल भरण्यात खर्च होते व उच्च शिक्षणासाठी पैसे कमी पडल्यानं मुलीच्या महत्वाकांक्षेशी समझोता करणं भाग पडतं. त्याच वेळेस या विम्याचं महत्त्व पटतं.