बाबा तुम्ही विधानसभाच लढवा: मुलीचा हट्ट
कराड: शेतकरी, बहुजनाचे राज्य टिकवायचे असेल तर,या सरकारला हाकलून दिले पाहिजे. आणि याची सुरुवात कराड मधून करायची आहे. जिल्हा बळकट करण्याचा विडा उचलून मतदारांना केंद्रबिंदू मानून योग्य तो निर्णय दोन दिवसात घेतला जाईल अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली. कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित बुथ कमिटी मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
दरम्यान या मेळाव्यात चव्हाण यांची मुलगी अंकिता खोत यांनी सांगितले की, सध्या विधानसभा की लोकसभा बाबा कोणती निवडणुक लढवणार याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. परंतु बाबांनी कराड विधानसभेचीच निवडणुक लढवावी अशी माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणे विरोधक म्हणतात पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईमध्ये असण्याची गरज नाही आहे. परंतु चंद्रकांत दादांची कृपा आणि मुख्यमंत्र्यांची मेहरबानी कराडवर आम्हाला नको आहे. त्यामुळे कराडमधला आमचा आमदार मुंबईला असणं गरज असल्याचे देखील अंकिता खोत यांनी सांगितले आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रजित मोहिते, युवक काॅग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील, निवास थोरात, विद्या थोरवडे, अजित पाटील चिखलीकर, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बंडा जगताप, नगरसेवक इंद्रजित गुजर, राजेंद्र यादव आबा, झाकीर पठाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.