खटाव तालुक्यात पंधरा किलोमीटरमध्ये रस्त्यांवर हजारो खड्डे
म्हासुर्णे – मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रायगाव फाटा-म्हासुर्णे-चितळी या पंधरा किलोमीटर अंतरात हजारो खड्डे पडले असून साईडपट्ट्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा होऊनही काम अजून सुरू झाले नसल्याने जनतेची प्रतीक्षा कायम आहे.
मल्हारपेठ-पंढरपूर महामार्ग खटाव तालुक्यातून जातो. इतर तालुक्यांच्या तुलनेत खटाव तालुक्यात या मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. रायगाव फाटा-चोराडे-म्हासुर्णे-चितळी-मराठानगर-मायणी या टप्प्यात शेकडो खड्डे पडले आहेत. या मार्गावरील साईटपट्ट्याही खचल्या आहेत. या मार्गाला छेद करून उरमोडी योजनेचे पाट गेले आहेत. या पाटाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूस रस्ता खराब झाले आहेत. महामार्गावरील खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
या रस्त्याबाबत शासन उदासी आहे. या रस्त्याचे पंढरपूर ते मायणीपर्यंतचे काम सुरू आहे. तेथून पुढच्या रस्त्याची चाळण झाली असली तरी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
– पोपट माने, म्हासुर्णे.या मार्गावरुन पायी दिंडी सोहळा जातो. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. साईडपट्ट्यांची अवस्था अतिशय भयानक आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करावे.
– सचिन शिंदे, म्हासुर्णे.