युद्धनौका, पाणबुडया, फायटर विमाने तैनात
नवी दिली – पुढचे काही दिवस पाकिस्तानी नौदल उत्तर अरबी समुद्रात युद्ध सराव करणार आहे. या सरावादरम्यान मिसाइल आणि रॉकेट फायरींगचा अभ्यास करणार आहे. पाकिस्तानी युद्ध सरावाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच काही अघटीत घडल्यास तात्काळ उत्तर देण्यासाठी भारताच्या सशस्त्र दलांनाही सज्ज ठेवण्यासाठी भारताने युद्धनौका, पाणबुडया, गस्ती घालणारी विमाने आणि फायटर विमाने तैनात केली आहेत. असे संरक्षण दलातील वरिष्ठ सूत्रांनी एका वर्तमानपत्राला सांगितले.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने इशारे दिले जात आहेत. भारतावर हल्ला होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत. पाकिस्तानचा हा दरवर्षी होणारा नियमित युद्ध सराव असला तरी त्यामागचा उद्देश यावेळी बदललेला आहे असे सूत्रांनी सांगितले. उत्तर अरबी समुद्रातून वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांसाठी पाकिस्तानने अलर्ट जारी केला असून 25 ते 29 सप्टेंबर या काळात ते मिसाइल, रॉकेट फायरींगचा अभ्यास करणार आहेत.
युद्धनौका आणि पाणबुडयांशिवाय भारतीय नौदल पोसीडॉन-8 आय या विमानाचा सुद्धा वापर करणार आहे. ही दीर्घपल्ल्याची टेहळणी क्षमता असलेली विमाने आहेत. युद्धसरावात सात ते आठ पाकिस्तानी युद्धनौका सहभागी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कलम 370 हटवल्यानंतर भारताची तिन्ही सैन्य दले पूर्णपणे सर्तक आणि सज्ज आहेत. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय नौदलाने आपला मोठा ताफा अरबी समुद्रात तैनात केला होता. यामध्ये विमानवाहू आयएनएस विक्रमादित्य, अण्वस्त्र पाणबुडी आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र यांचा समावेश होता.