बेटावरील हिरवाई हरपली; नागरिकांसह निसर्गप्रेंमीचा हिरमूस
वाठार – कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीपात्रातील रेठरेचे निसर्गसौंदर्य खुलविणाऱ्या बेटावरील झाडे पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली असून, कित्येक झाडे कोलमडून पडली आहेत. त्यामुळे नदीपात्रातील या बेटाची दुर्दशा झाली असून हिरव्यागार बेटावरील हिरवाई हरपल्यामुळे निसर्गप्रेंमीचा हिरमूस झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे, कराडपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या रेठरे बुद्रुक हे प्रगतशील गाव आहे.
वाठार मार्गे कृष्णा कारखान्याकडे जाताना वाठारच्या पुढे रेठरे खुर्द गावानंतर दोन किमी अंतरावर कृष्णा नदीवरील पूल लागतो. पुलावर प्रवेश करताच समोर पुलाच्या उजव्या बाजूस कृष्णाकाठावरील प्रशस्त उभे असणारे महादेव मंदीर नजरेस पडते. पुलावर आल्यानंतर डाव्या बाजूस नदीपात्रातील घनदाट झाडी असणारे बेट पाहताच मन प्रसन्न होत असे, या बेटामुळे गेली कित्येक वर्षांपासून रेठरे बुद्रुक गावाचे निसर्ग सौदर्य अगदी खुलून दिसते.
नदीपात्रात अगदी मधोमध असणारा झाडांचा पुंजका आणि याच्या दोन्ही बाजूंनी वाट काढत वाहणारे पाणी पाहिले की, पुलावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना जणू आपण पर्यटनालाच आलो असल्याचा भास होतो. कित्येकजण पुलाच्या मध्यभागी उभे राहून या बेटासोबत सेल्फी काढत असतात.
गत महिन्यात सात ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरामुळे रेठरे पुलावरून पाणी गेले होते. तसेच संपूर्ण गावाला पुराचा विळखा बसला होता. या महापुरामुळे रेठरेसह संपूर्ण कृष्णाकाठ परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या महापुराने कृष्णाकाठाचे क्षणात होत्याचे नव्हते करून टाकले.
या महापुराचा या बेटालाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या बेटावरील कित्येक झाडे पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली आहेत. तसेच कित्येक झाडे तुटून उन्मळून पडली आहेत. या बेटावरती उभी असणाऱ्या झाडामध्ये पुराच्या पाण्यातून वाहून आलेला कचरा, कागद, विविध प्रकाराची घाण अडकलेली आहे. त्यामुळे या बेटाला अवकळा प्राप्त झाली असल्याचे दिसत आहे. बेटावरील मोडतोड झालेली, घाण अडकलेली झाडी पाहिली की महाभयंकर पुराची क्षणचित्रे डोळ्यासमोर येऊन अंगावर शहारे आणतात. एकंदरीतच या बेटाला गतवैभव आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नागरिक सांगत आहेत.